ताज्याघडामोडी

शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार का, सरकार स्थिर आहे का? देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले…

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या म्हणजे १६ आमदारांच्या अपात्रते प्रकरणी सुप्रीम कोर्ट उद्या निकाल देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून विजयाचे दावे केले जात आहेत. आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे. प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतही स्पष्टपणे बोलले.

आम्ही आशावादी आहोत, कारण आमची बाजू भक्कम आहे. त्यामुळे योग्य निकाल येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. अर्थात निकाल येईपर्यंत आपण थांबलं पाहिजे. पण त्यापूर्वी तर्कवितर्क करणं योग्य नाही. सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. त्याच्यावर कुठलाही दावा किवा तर्क मांडणं योग्य नाही. पण आम्हा पूर्णपणे आशा आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील अशी चर्चा निकालाच्या पार्श्वभूमीवर आहे? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. ‘अशा चर्चा म्हणजे मूर्खांचा बाजार आहे. यापेक्षा अधिक काय बोलायचं. कशासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील, काय कारण आहे, काय चूक केली आहे त्यांनी? एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. आणि पुढची निवडणूक एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतानाच आम्ही लढू’, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. सरकार स्थिर आहे का? असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. सरकार एकदम स्थिर आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, विजय आमचाच होईल म्हणणाऱ्यांनी काहीतरी गडबड केलीय, असा संशय शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *