आठवड्याभरात सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती शाह निवृत्त होत आहेत. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयातील पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी झाली. या घटनापीठामध्ये न्यायमूर्ती शाह यांचाही समावेश होता.
त्यामुळे त्याआधीच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल येण्याची शक्यता आहे. हा निकाल काय असेल, यावर अंदाज बांधले जात असून त्यासंदर्भात आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठं विधान केलं आहे. आमदारांच्या अपात्रतेचा अधिकार विधानसभा अध्यक्षांनाच असल्याचा मुद्दा सातत्याने समोर येत आहे. त्यासंदर्भात त्यांनी सविस्तर भूमिकाही मांडली आहे.
कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी सर्वोच्च न्यायालय १६ आमदारांना स्वत:च अपात्र ठरवू शकतं, अशी एक शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे हा विधिमंडळाच्या अधिकारांत हस्तक्षेप ठरू शकेल, असा दावा यावर केला जात असताना त्यासंदर्भात राहुल नार्वेकरांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे.
आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात याचिका दाखल झाल्यापासूनच त्यासंदर्भात प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं नार्वेकर म्हणाले. “सर्व आमदारांना आम्ही यासंदर्भातल्या नोटिसा पाठवल्या आहेत. काहींनी उत्तर देण्यासाठी अधिकचा वेळ मागितला आहे. काहींकडून उत्तरासंदर्भातली प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे”, असं त्यांनी माध्यमांना सांगितलं.