एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला करण्यात आल्याची घटना जिल्ह्यातील अकोट शहरात घडली. तू मला आवडते, मी तुझ्याशी लग्न करेन, तू माझ्याबरोबर ये, असा प्रस्ताव आरोपी तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीला दिला. पण तिने नकार देताच धारदार चाकूने तरुणीच्या मानेवर अन् शरीरावर वार केले. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली. हल्ल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. जखमी तरुणी रक्तबंबाळ अवस्थेत जागेवरच कोसळली. स्थानिक नागरिकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर शस्त्रक्रिया पार पडली आहे. तिच्या मानेवर २५ टाके लागले आहेत. सद्यस्थितीत तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तर आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.
अकोट शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप पळसपगार यांनी या प्रकरणी माहिती दिली आहे. अकोट शहरातील एक १८ वर्षीय तरुणी (बदलेलं नाव) अमृता. ही २५ एप्रिलला संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास दुकानात सामना घेण्यासाठी घरून निघाली. वाटतेच सागर केशव रेखाते (वय २६ राहणार कसबा, मोठे बारगण, अकोट) याने अमृताला रस्त्यात थांबवलं. ‘तू मला आवडते, मी तुझ्याशी लग्न करेन, तू माझेबरोबर चल म्हणजे तुही माझ्यासोबत प्रेमसंबध ठेव’, असे त्याने म्हटले. तिने याला विरोध केला. तरीही त्याचा हट्ट सुरूच होता. अमृताने याला प्रचंड विरोध केला. त्यानंतर आरोपी सागरने तिच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केला. तसेच शरीरावरही वार केले, यामध्ये ती गंभीर जखमी झाली. हा हल्ला भरदिवसा रस्त्यावर घडल्याने अकोट शहरात खळबळ उडाली होती.