भारतीय हवामान विभागाने पुढचे दिवस देशातल्या बहुतेक भागांमध्ये तापमान वाढण्याचा इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांमध्ये भारतातल्या अनेक भागांमध्ये तापमान 2 ते 4 डिग्री सेल्सियसने वाढण्याची शक्यता आहे, असं आयएमडीने सांगितलं आहे.
दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढचे दोन दिवस मध्य प्रदेश, ओडिसा, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये गडगडाटासह पावसाचा आणि जलद वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आयएमडीने 1 एप्रिललाच उत्तर पश्चिम भारताचा काही भाग सोडून बहुतेक भागात एप्रिल ते जून महिन्यात कमाल तापमान जास्त राहील, असं सांगितलं होतं. मध्य, पूर्व आणि उत्तर-पश्चिम भारतात जास्त उष्णता असेल, असं हवामान खात्याने सांगितलं होतं. बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजारत, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागात उष्णतेची लाट येईल, असं भारतीय हवामान खात्याचे महानिदेश मृत्यूंजय महापात्रा यांनी सांगितलं होतं.