ताज्याघडामोडी

राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे १३-१४ आमदार आमच्याकडे येणार, मंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज संध्याकाळी रत्नागिरीतील खेडमध्ये गोळीबार मैदानात मोठी सभा होणार आहे. शिंदे गटाने या सभेची जय्यत तयारी केली आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी ही सभा आयोजित केली आहे. काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची याच मैदानावर जाहीर सभा झाली होती. आता याच मैदानावरून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर कोकणातील शिवसेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठा दावा केला.

राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे १३-१४ आमदार शिवसेनेच्या म्हणजे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचा मोठा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. ‘कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातले १३ ते १४ आमदार आमच्यात येणार हे नक्की’, असं उदय सामंत म्हणाले. ‘कोण आमच्यात येणार आहेत ते त्यांना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती आहे’, असंही उदय सामंत म्हणाले.

ही प्रत्युत्तर देण्यासाठीची सभा नाहीए. ५ तारखेच्या सभेत असं सांगण्यात आलं की मी रिकाम्या हाताने आलेलो आहे. माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही, असं काही लोक सांगयला आली होती. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उत्तर देतील. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, मी भरभरून देणार आहे. मुख्यमंत्री म्हणून जे जे काही कोकणाला द्यायचं आहे ते घेऊन आलोय. आणि त्याची उधळण मुख्यमंत्री शिंदे हे या सभेत करतील. आमचे हात रिकामे आहेत म्हणून तुम्ही आमच्याकडे राहा, अशा प्रकारचं सहानुभूतीपूर्वक भाषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार नाहीत, असा टोला मंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे.

५ तारखेला जी सभा झाली त्याला आपण सभा म्हणू शकत नाही. त्याच्यामध्ये विचार नव्हता. त्याच्यामध्ये फक्त शिव्या होत्या. कोण कोणाला लांडगा, कोण कोणाला कोल्हा म्हणत होतं. एवढचं नव्हे जे माजी खासदार आहेत अनंत गीते यांनी फार मोठी टीका केली. पण बंडाची सुरुवात माणगावमध्ये अनंत गीतेंनीच सुरू केली होती. त्यांनी थेट उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं होतं. शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला, असं गीते म्हणाले होते. आणि इकडे काही लोकं सांगतात की भाजपकडे वॉशिंग मशिन आहे. मग हे विचार बदलणारं वॉशिंग मशिन काही लोकांकडे आहे. ज्यांनी बंडाशी सुरुवात केली ते एकनाथ शिंदे यांना शिकवायला चालले आहेत. त्यांच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकत नाही. यासभेतून कोकणच्या विकासाची दिशा स्पष्ट होईल. आणि तशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांचं भाषण असेल, असं उदय सामंत यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *