ताज्याघडामोडी

विवाहित महिलेने उपचारादरम्यान प्राण सोडले; मृत्यूचं कारण समोर आल्यानंतर सर्वजणच झाले सुन्न

महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी अनेक कठोर कायदे असतानाही अशा घटना कमी होत नसल्याचं चित्र आहे. अशातच बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या लोकांकडून शारीरिक व मानसिक छळ करून विवाहितेला तब्बल १२ दिवस उपाशी ठेवण्यात आलं. त्यामुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी खामगाव तालुक्यातील भालेगाव बाजार येथील विवाहितेच्या सासरच्या कुटुंबातील सदस्यांवर पिंपळकर राजा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

जळगाव जामोद दुर्गा चौकातील पवन रमेश नवथळे यांनी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, माझी बहीण पूनम हिचा विवाह पाच वर्षांपूर्वी भालेगाव बाजार येथील श्रीकांत प्रकाश भोरे याच्यासोबत झाला होता. श्रीकांत व त्याचे वडील प्रकाश केशव भोरे (वय वर्ष ६०), अलका प्रकाश भोरे (वय वर्ष ५५), ननंद अमृता रोहित गावत्रे (राहणार तपोवन अमरावती) यांनी संगनमत करून माझ्या बहिणीचा मानसिक व शारीरिक छळ केला. एवढेच नव्हे तर तिला १० ते १२ दिवस उपाशी ठेवले. परिणामी तिची प्रकृती गंभीर झाली. त्यानंतर तिला अकोला येथे उपचारासाठी नेले असता उपचार सुरू असतानाच तिचा ३ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. या तक्रारीवरून उपरोक्त चारही आरोपींविरुद्ध पिंपळगाव राजा पोलिसांनी विविध कल्मान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

एकीकडे आपण प्रगतीच्या दिशेने पावलं टाकत असताना आजही महिलांना लग्नानंतर शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे. अशा घटना घडल्या की काही काळ कायदे कठोर करण्याची भाषा केली जाते. मात्र त्यानंतर अशा घटना रोखण्यात अपयश येत असल्याचं दिसतं. बुलढाणा जिल्ह्यातील या ताज्या घटनेनं पुन्हा एकदा महिला अत्याचाराचं कटू वास्तव समोर आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *