ओरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्याचा ठराव विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशानात मंजूर करण्यात आला होता. विशेष म्हणजे याआधी महाविकास आघाडीने नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला होता. मात्र शिंदे-फडणवीस सरकारने त्याला स्थगिती दिली होती. त्यानंतर पुन्हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला. आता केंद्राने यास मंजुरी दिल्याने नामांतराचा प्रश्न निकाली निघाला आहे.