ताज्याघडामोडी

पायाला शेण लागलं, कालव्यात धुताना ३० वर्षांचा तरुण बुडाला

अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा येथील रहिवासी असलेल्या ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. शेणाची घाण धुण्यासाठी गेला असताना पाय घसरल्यामुळे तो कालव्यात पडला. मात्र पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जहीर बेग रफीक बेग असे ३० वर्षीय युवकाचे नाव आहे. कुऱ्हा येथील बस स्थानक परिसरात त्याचे स्टेशनरीचे दुकान आहे.

जहीर बेग आणि त्याचे दोन सहकारी जनावरांना चारण्यासाठी बावळी शेत शिवारात गेले होते. चराईनंतर जहीर घरी परत येत होता. त्यावेळी शेणाची घाण त्याच्या पायाला लागली. त्यामुळे जहीर पाय धुण्याकरिता कालव्यावर गेला. कालव्याच्या काठाशी पाय धुवत असतानाच त्याचा तोल गेला आणि तो कालव्यातील पाण्यात पडला. ही घटना पाहून त्याच्या सहकाऱ्यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरु केली.

फोनवरून एकाने गावातील नागरिकांशी संपर्क साधत जहीर कालव्यातील पाण्यात पडल्याची माहिती दिली. त्यामुळे परिसरात गावकऱ्यांची एकच गर्दी जमा झाली होती. त्याला वाचविण्यासाठी गावकऱ्यांनी आटोकाट प्रयत्न केला. पोलिसांना देखील याची माहिती देण्यात आली, परंतु कोणाच्याही प्रयत्नांना यश आले नाही.

पोलीस व गावकऱ्यांच्या मदतीने कालव्याच्या पाण्यात जहीरचा शोध सुरू करण्यात आला. परंतु, दुर्दैवाने किमान दोन किमी अंतरावर त्याचा मृतदेह आढळून आला. कुऱ्हा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *