मुलबाळ होत नसल्यामुळे आणि घरात आर्थिक सुबत्तेसाठी विवाहितेला स्मशानभूमीतील राख पाण्यातून देऊन पिस्तुलाच्या धाकाने हाडांची पावडर खाण्यासाठी देण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.प्रकरणी संबंधित कुटुंबीयांविरूद्ध सिंहगडरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयेश कृष्णा पोकळे, श्रेयश कृष्णा पोकळे, ईशा श्रेयश पोकळे, प्रभावती कृष्णा पोकळे कृष्णा विष्णू पोकळे (सर्व रा. राधाकृष्ण व्हिला, पोकळे परडाईज, धायरी), दीपक जाधव आणि बबिता उर्फ स्नेहा जाधव (रा. निगडी प्राधिकरण) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कॉम्प्युटर इंजिनिअर असून एप्रिल 2019 मध्ये त्यांचे जयेशसोबत लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसात सासरच्या मंडळीनी महिलेचा छळ सुरू केला. सासार्यांच्या मागणीनुसार महिलेच्या कुटुंबीयांनी जयेशला सोन्याचे दागिने, गाडी घेण्यासाठी 10 लाख रुपये दिले. काही दिवसानंतर त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाले. घरामध्ये भरभराटीसाठी आणि महिलेला मूलबाळ होत नाही, यामुळे पोकळे कुटुंबीयांकडून अमावस्येला अघोरी कृत्य सुरू करण्यात आले.
एका अमावस्येला रात्रीच्या वेळी दीर, जाऊ, पती व सासुसासर्यांनी महिलेला स्मशानभूमीमध्ये नेले. तेथे जळलेल्या प्रेताची काही हाडे गोळा करीत राख मडक्यात घेतली. त्यानंतर स्मशानामधून आणलेली राख पाण्यामध्ये मिसळून महिलेला पिण्यास दिली. त्यानंतर 11 फेब्रुवारी 2021ला अमावस्येच्या दिवशी पूजा असल्याचे सांगुन तक्रारदार महिलेला निगडीत नेले. तेथे मांत्रिक महिलेने पुजेच्या ठिकाणी बसण्यास सांगितले. हाडाची पावडर करून मांत्रिक महिलेने तक्रादार महिलेला खायला सांगितली. त्यास नकार दिला असता दीपक जाधव यांनी त्यांचेकडील रिव्हॉल्व्हर काढून महिलेच्या डोक्याला लावून पावडर खाण्यास भाग पाडले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव करत आहे.