मुसळधार पावसाचा इशारा
राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. अशात हवामान खात्याकडून पुढचे दोन दिवस असाच पाऊस राहिल असा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत १४ जुलैपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट असून यासोबतच पालघर, नाशिक, पुणे यासह ४ जिल्ह्यांमध्ये १५ जुलै या कालावधीत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे चाकरमान्यांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस होईल, असा इशारा आहे. मुंबईतील उपनगरांत रात्रीपासून पाऊस सुरू आहे तर पालघरमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, पालघरमध्ये भूस्खलन होऊन अनेक लोक अडकल्याची बातमी आहे. वसई परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली. इथे घरांचे नुकसान झाले असून अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. आतापर्यंत दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे. पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.