Uncategorized

भगिरथ भालके विरोधात ‘दोघे’ एकत्र येणार कि स्वतंत्र लढणार ?

‘विट्ठल’ च्या याद्या मागवल्या,सुरु झाली सभासदांमध्ये चर्चा 

 

पूर्वाश्रमीचा अण्णा गट आणि तालुक्यातील परिचारक गट यांच्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई या तालुक्यातील तीन पिढ्यानी गेल्या ४३ वर्षात अगदी जवळून पहिली आहे.आणि या राजकीय लढाईत महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे ती पंढरपूर तालुक्याच्या कृषी औद्योगिक क्रांतीचा पाया घातलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा एकेकाळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यचा शेअर होल्डर असणे म्हणजे शेअर बाजारातील ब्ल्यू चिप कंपन्यांचे शेअर हाती असलेला गुंतवणूकदार असणे अशी प्रतिमा होती.आणि याचं वेळी शहर तालुक्याच्या राजकारणात विठ्ठल परिवार विरोधात पांडुरंग परिवार असा राजकीय संर्घष शिगेला पोहचला होता.तू तिकडे तर मी इकडे हे गावगाड्यातील राजकारणाची तऱ्हा राजकारणात दोन्ही परस्पर विरोधी गटाला बळ देत गेली.     

मात्र याच वेळी विठ्ठलच्या सभासदांमध्ये एक अस्वस्थता होती.१९८० पासून आमदारकी हाती नव्हती,८५, ९१, ९५ , ९९ ,२००४ या विधानसभा निवडणुकात विठ्ठलच्या चेअरमन नी नशीब आजमावले आणी अपयश पदरी पडले.मात्र २००९ ला मतदार संघ पुनर्र्चना झाली आणि पंढरपूर तालुका ४ विधानसभा विभागाला गेला.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमन स्वर्गीय भारत भालके यांनी साम,दाम आणि भेद या त्रिसूत्रीचा सुयोग्य वापर करत विठ्ठल परिवाराची आमदारकीची ईर्षा आणि इच्छा पूर्ण केली.२०१४ मध्ये तर थेट परिचारक विरुद्ध भालके आमने सामने उभे ठाकले आणि स्वर्गीय भारत भालकेंनी विठ्ठल परिवाराची गेल्या अडीच दशकाची इच्छा पूर्ण करत थेट परिचारक गटास मात दिली.   मात्र याच काळात एक राजकीय बलस्थान असलेला विठ्ठल मात्र वरचेवर अडचणीत येत चालला.पण राजकारणापुढे हतबल ठरू लागला.कर्जाचे आकडे दरवर्षी वाढत चालले आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची आर्थिक अवस्था यावर उघडपणे चर्चा होऊ लागली.पुढे २०१९ ला तर अडचणीतील विठ्ठल बंद ठेवावा लागला आणि राजकारणापेक्षा अर्थकारण महत्वाचे आहे असे समजणारे काही सभासद जागे झाले.    

याच दरम्यान २०१६ च्या विठ्ठल च्या निवडणुकीत भगीरथ भालके संचालक म्हणून सेवेत रुजू झाले पण सक्रिय झाले असे म्हणणे धाडसाचे ठरेल.नोव्हेंबर २०२० मध्ये आमदार भारत भालके यांचे निधन झाले आणि विठ्ठल परिवारास मोठा धक्का बसला.विठ्ठल परिवार विरुद्ध पाडुरंग परिवार या राजकीय इर्षेच्या गावगाड्यातील लढतीत विठ्ठल परिवार नेतृत्वहीन झाला.तसे पाहिले तर विठ्ठल परिवारात स्व.भारत भालके सह अनेक समांतर नेते होते पण त्यांचे अस्तित्व आणि प्रभाव मर्यादित असल्याने आणि सतत बदलत्या भूमिकेत असल्याने तालुक्याच्या राजकारणात सतत आमने सामने इर्षेने ग्रामपंचायत पातळीवरील निवडणुकी पासून ते थेट विधानसभेची लढणाऱ्या विठ्ठल परिवार व परिचारक सर्मथक या राजकीय लढाईत या समांतर नेत्यांचे प्रभाव क्षेत्र आणि कार्यक्षेत्र मर्यदित असल्याने स्व.आमदार भारत भालके हे  या कमालीचे लोकप्रिय ठरले. अशातच २०१९-२० च्या सिझनमध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीमुळे बंद ठेवावा लागला तरी विधानसभेच्या निवडणुकीत समोर स्व.माजी आमदार सुधाकरपंत परिचारक हे उमेदवार असल्याने विठ्ठल परिवाराच्या राजकीय लढाईतील सर्वात सर्वात महत्वपूर्ण निवडणूक म्हणून ‘विठ्ठल’ चे सर्व आजी माजी संचालक आणि बहुतांश सभासद हे एकत्र येऊन स्व.आ. भारत भालके यांच्या विजयासाठी जीवाचे रान करताना दिसून आले.

 तिकडे ‘विठ्ठल’ ची दारे बंद होती,ऊस गाळपास कुठल्या कारखान्याकडे पाठवायचा याची चिंता विठ्ठल परिवारातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सतावत होती मात्र त्याच वेळी इकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती.आपल्याला गावगाड्यातील राजकारणात बळ देणाऱ्या नेत्याला विधानसभेत पाठविले पाहिजे यासाठी अर्थकारण बाजूला सारून राजकारण प्रभावी भूमिका बजावताना दिसून आले.स्व.आ.भारत भालके हे बहुप्रतीक्षित लढतीत विजयी झाले.     

 आता बंद ‘विठ्ठल’दारे उघडली जातील अशी आशा पल्लवित झाली कारण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले होते आणि स्व.आ.भालके हे या आघाडीचे आमदार होते.विशेष बाब म्हणून डिसेंबर २०१९ मध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास थकहमी देण्याचा निर्णयही शासनाने घेतला आणि ती दिली गेली.२०-२१ चा गळीत हंगाम सुरु झाला पण तोडणी वाहतूक यंत्रणा अपुरी पडली,कसेबसे गाळप आटोपून कारखाना बंद झाला.याच दरम्यान स्व.आ.भारत भालके यांचे दुःखद निधन झाल्याने विठ्ठल परिवाराने एक खंबीर राजकीय नेतृत्वही गमावले.पुढे भगीरथ भालके चेअरमन झाले,विठ्ठल पुन्हा २०२१-२२ च्या सिझन मध्ये बंद ठेवावा लागला आणि राजकारणा पेक्षा अर्थकारण महत्वाचे समजू लागलेली विठ्ठल परिवारातील नवी पिढी मात्र कमालीची अस्वस्थ होताना दिसून आली.तरीही राजकीय अस्तित्व तर आधी टिकवू,कारखाना पुन्हा नक्की उभारी घेईल अशी आशा असल्याने पोटनिवडणुकीत विठ्ठल कारखाना आणि त्याची आर्थिक अवस्था आणि त्याला जबाबदार असणारे नेतृत्व यावर अगदी विरोधकांकडून टोकाची टीका आणि खिल्ली उडवली जात असताना देखील राज्यात सत्ता आपली आली आहे होईल सुरळीत या आशेने विठ्ठल परिवार पोटनिवडणुकीत तडफेने खिंड लढवताना दिसून आला.विठ्ठल बंद असल्याचे सारे शल्य पोटात घालून.         

  भगीरथ भालके पोटनिवडणुकीत पराभूत झाले आणि नॉट रिचेबल राहू लागले.त्यांच्यावर या बाबत टीकाही होऊ लागली पण फारशी दखल घेतली जात नाही असा अनुभव येऊ लागलेली युवा पिढी दुरावू लागली.अस्वस्थ होऊ लागली आणि इथूनच विठ्ठल परिवाराचा तिसरा संक्रमण काळ सुरु झाला आहे असे निरीक्षण माध्यमातून मांडले जाऊ लागले.१९९६ मध्ये विठ्ठल परिवारात प्रथमच नेतृत्वाची खांदेपालट झाली होती आणि स्व.वसंतदादा काळे हे विठ्ठल परिवारात एक बलाढ्य आणि पारंपरिक विरोधकांना टोकाचे आव्हान देण्यास सक्षम असलेले नेतृत्व म्हणून या परिवारास लाभले.विठ्ठल परिवारातील मागील पिढीने स्व.वसंतदादा काळे यांची प्रचंड लोकप्रियता अनुभवली आहे.जवळून पाहिली आहे.मात्र अल्पावधीतच त्यांचे दुःखद निधन झाले.पुन्हा विठ्ठल परिवाराच्या नेतृत्वाचा तिढा निर्माण झाला.परिवारातील दोन गट प्रथमच ‘विठ्ठल’ च्या निवडणुकीच्या निमित्ताने आमने सामने लढले,रस्त्यावर देखील लढले,आणि हातात दगड घेऊन देखील लढले.यातूनच पुढे आले ते स्व.भारत भालके यांचे नेतृत्व.होय १९९९ मध्ये जर कोणी अंदाज वर्तविला असता कि विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भारत भालके होतील आणि ते १७ वर्षे चेअरमन म्हणून कामकाज पाहतील तर नक्कीच ‘त्या’ ज्योतिषाची टर उडवली गेली असती.पण घडले मात्र नक्की तसेच.आणि यासाठी जसे स्व.भारत भालके यांचे राजकीय चातुर्य महत्वाचे ठरले तसेच परिवारातील इतर नेत्यांचे ‘लिमिटेड’ राजकीय धाडसही कारणीभूत होते.   

  २००४ नंतर विठ्ठल अधिक आर्थिक प्रगती साधू लागला,अतिरिक्त जमिनीची खरेदीही झाली.स्व.भारत भालके यांची लोकप्रियताही मोठ्या प्रमाणात वाढत गेली.२००४ च्या विधानसभा निवडणुकीत विठ्ठल परिवारातीलच दोन नेत्याच्या लढतीत जे घडले त्यामुळे विठ्ठल परिवारात आणखी अस्वस्थता निर्माण झाली कारण या परिवारातुन  आता आमदारकी आपल्याकडे हवी अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली होती.स्व.आ.भारत भालकेंनी २००९ च्या निवडणुकीत थेट विजयसिह मोहिते पाटील यांना पराभूत करून विठ्ठल परिवाराची स्वप्नपूर्ती केली.     मात्र याच दरम्यान तिकडे ‘विठ्ठल’ चा विस्तार विठ्ठल ला आर्थिक अडचणीचा ठरू लागला.कर्जाचा बोजा वाढू लागला पण होईल सुरळीत या आशेने सारे काही जनरेआड करता करता २०१४ ची विधानसभा निवडणूक आली.समोर थेट परिचारक उमेदवार असल्याने पुन्हा राजकीय इर्षेने बळ घेतले.त्या निवडणुकीत स्व.आ.भारत भालके हे विजयी झाले पण ‘विठ्ठल’ कर्जबंबाळ होऊ लागला.२०१५ पासून तर थेट राजकीय टीकेचा धनी ठरू लागला.स्व.आ.भारत भालके हे दोन तालुक्याचा कारभार पहात असताना ‘विठ्ठल’ कडे लक्ष देण्याची जबाबदारी त्यांनी भगीरथ भालकेंच्या खांदयावर सोपवावी असाही एक मतप्रवाह व्यक्त होत गेला पण घडत गेले वेगळेच.खरी जबाबदारी ते ‘ दोन’ संचालकच पार पाडत आहेत याची अनुभूती विठ्ठल च्या अनेक सभादांना येत गेली.नाराजी व्यक्त होत गेली पण ती कधी दखलपात्र समजली गेली नाही.या दरम्यान अधून मधून भगीरथ भालके हे कारखान्यावर ये-जा करीत असलेले दिसून येत.पण स्व.आ.भालकेंच्या अपरोक्ष ‘दोन’ संचालकच सारी जबाबदारी पार पाडताना दिसून येत.     

 आज ‘विठ्ठल’ची दारे बंद आहेत आणि पोटनिवडणुकीतील पराभवामुळे विठ्ठल परिवारातील राजकीय महत्वकांक्षेलाही ब्रेक लागला आहे.विठ्ठल परिवारात तिसरा संक्रमण काळ सुरु झाला आहे.आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या लवकरच होत असलेल्या निवडणुकीत विठ्ठल परिवार नवा नेता देणार कि स्व.आ.भारत भालके यांच्या नेतृत्वाचा वारसा भगीरथ भालके यांचे रूपाने पुढे चालूं राहणार यावर या निवडणुकीत शिक्का मोर्तब करणार हे स्पष्ट होणार आहे.       

 विठ्ठल च्या आगामी निवडणुकीत एकीकडे अभिजित पाटील हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळास थेटपणे आव्हान देत सभासदांच्या गाठीभेटी घेत कारखान्याच्या कारभाराचा लेखा जोखा मांडत,त्रुटी दाखवत परिस्थितीचे गांभीर्य कथन करत आहेत तर दुसरीकडे विद्यमान संचालक युवराज पाटील,ऍडव्होकेट गणेश पाटील आणि दीपक पवार हे गावभेटी दौरे करून सभासदांना ‘विठ्ठल’ ची करूण आर्थिक कहाणी कथन करत आता नाही तर पुन्हा नाही,हीच ती वेळ आहे विठ्ठल ला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याची असे आवाहन सभासदांना करताना दिसून येत आहेत.   

मात्र याच वेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन भगीरथ भालके हे कल्याण काळे यांना सोबत घेत विठ्ठलच्या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी व्युव्हरचना करीत आहेत.स्व.आमदार भारत भालके यांची राहिलेली कमालीची लोकप्रियता हे या निवडणुकीत भगीरथ भालकेंचे बलस्थान मानले जात असले तरी आगामी निवडणूक हि निर्णायक ठरणार आहे,’विठ्ठल’ च्या भविष्यवार शिक्कामोर्तब करणारी ठरणार आहे एवढे मात्र नक्की.आणि विठ्ठल परिवार नवा नेता निवडतो का याकडे पंढरपूर शहर तालुक्यातील ‘विठ्ठल’ सभासद अथवा शेतकरी नसलेल्या परंतु परिचारक गटास विरोधाची मानसिकता असलेल्या सामान्य नागिरकांचे लक्ष लागले आहे. 

  ‘विठ्ठल’ च्या आगामी निवडणुकीत अभिजित पाटील आणि युवराज पाटील हे स्वतंत्र पॅनल देऊन भगीरथ भालकेंना विरोध करणार कि एकत्र येणार याकडे आता विठ्ठल परिवाराचे लक्ष लागले आहे तर ‘त्या दोन ‘ संचालकांना कुठल्या पॅनल मधून उमेदवारी मिळणार आणि ‘ते दोन ‘ संचालक निवडणूक लढविणार का ? याचीही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.     

   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *