ताज्याघडामोडी

देवेंद्र फडणवीसांचे महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत मोठे वक्तव्य

नागपुरात गोव्याच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस येणार असल्यामुळे विमानतळाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत विजयासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान फडणवीसांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.

फडणवीस गोव्याच्या निकालानंतर पहिल्यांदाच नागपुरात येत असल्यामुळे विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी जंगी तयारी करण्यात आली होती. फडणवीस पोहोचताच विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर विमानतळापासून ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरापर्यंत रॅली काढण्यात येत आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा जो सत्कार, स्वागत मी स्वीकारत आहे, तो मोदींच्या आणि टीम गोव्याच्या वतीने असल्याचे म्हटले. तसेच मला जी संधी मिळाली त्याचे सोने करण्याचा मी प्रयत्न केला. हे आपल्या लोकांनी दिलेले प्रेम असून मोदींच्या कामाला दिलेली पोचपावती आहे. त्याबद्दल मी आभारी असल्याचेही म्हणाले.

पूर्ण बहुमताचे भाजप सरकार महाराष्ट्रात २०२४ ला पहायला मिळेल, असा विश्वास यावेळी फडणवीसांनी व्यक्त केला. गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूरमध्ये मिळालेला विजय हा मोदींच्या कामाला लोकांनी दिलेली पावती आहे. महाराष्ट्रातही तीच स्थिती असल्याचे फडणवीस म्हणाले.

राजकारणात काहीही होऊ शकते. पण मी काही म्हटले, तर लगेच सरकार पडणार अशा चर्चा सुरु होतात, याच्यात मला रस नाही. महाराष्ट्रात भाजपचेच पूर्ण बहुमताचे सरकार मी आणणार, असे यावेळी त्यांनी सांगितले.

जेव्हा महाराष्ट्रात निवडणुका होतील, तेव्हा भाजप नंबर १ राहील आणि भाजप आपल्या भरवशावर सरकार आणणार, असे यावेळी फडणवीसांनी सांगितले. नागपूर, मुंबई पालिका निवडणूक असो आम्ही नेहमी तयारच असतो, असे सांगताना सध्या स्वतंत्र वाटचाल सुरु असल्याचे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात आमची शक्ती वाढलीच आहे. आगामी सर्व निवडणुकीत ही ताकद पहायला मिळेल, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *