राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या ईडी चौकशीप्रकरणी तपास यंत्रणेचा गैरवापर होत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
‘आम्हाला खात्री होती की आज न् उद्या हे घडेल. कारण नवाब मलिक हे जाहीरपणे बोलतात, त्यामुळे काहीतरी प्रकरण काढून त्यांना त्रास दिला जात आहे. त्यामुळे याबद्दल भाष्य करण्याची गरज नाही,’ असेही ते म्हणाले.
शरद पवार पुढे म्हणाले, ‘काही झाले तर आणि विशेषकरुन मुस्लीम कार्यकर्ता असला तर दाऊदचे नाव घेतले जाते. मी राज्याचा मुख्यमंत्री असतानाही असा आरोप झाला होता. त्याला आता २५ वर्ष झाली.
पुन्हा तशीच नावे घेऊन लोकांना बदनाम करणे, लोकांना त्रास देणे, सत्तेचा गैरवापर करण्याचे काम सुरु आहे. जे लोक केंद्र सरकारविरोधात आणि तपास यंत्रणांविरोधात भूमिका मांडतात त्यांना हा त्रास देण्याचा प्रयत्न असून तेच घडले आहे, असे ते म्हणाले.
आज पहाटे ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी पोहचले. त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले. दाऊद इब्राहिम आणि त्याचा भाऊ इक्बाल कासकर यांच्याशी संबंधित नवाब मलिकांची ईडी चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडीकडून कारवाई सुरू आहे. तसेच याप्रकरणी चौकशीसाठी नवाब मलिक यांना ईडीने समन्स बजावले होते.