Uncategorized

गटबाजीची फाटी पुसणार कि कठोरपणे जालीम डोस देणार ?

राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील हे सोमवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून सोमवारी दुपारी १२ वाजता पंढरपुरातील संत तनपुरे महाराज मठ या ठिकाणी ते पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉग्रेसचे विविध पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्याशी आढावा बैठकीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.अशी माहिती राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाकार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.    एप्रिल २०२१ मध्ये झालेल्या पंढरपूर विधानसभा मतदार मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही मतदार संघात तळ ठोकून होते.या दोन्ही तालुक्यात भगीरथ भालके यांच्या विजयासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली खरी पण त्यास अपयश आले होते.डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदार संघ व स्थानिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीने यश संपादन केले होते.तर अनेक वर्षानंतर पदवीधर मतदार संघात विजय संपादन करत राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाला मोठा हादरा दिला होता.२००९,१४ आणि १९ या विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्रिक केलेले स्वर्गीय आमदार भारत भालके यांचे कोरोनाने निधन झाल्याने झालेल्या २०२१ च्या पोटनिवडणुकीत प्रचाराची सूत्रे राष्ट्रवादीच्या राज्यातील दिग्ग्ज नेत्यांनी हाती घेतली होती तर महाविकास आघाडीतील प्रत्येक स्टार प्रचारकाने भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी हजेरी लावली होती.तरीही थोडक्या मतांनी भगीरथ भालके पराभूत झाले आणि वाजे प्रकरण,वीजबिल वसुली,१०० कोटीची वसुली अशा अशा अनेक आरोपांनी घेरलेल्या राष्ट्रवादीस बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात मोठा हादरा बसला होता.     

२०२१ च्या  पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या पराभवास अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्याची चर्चा निकालानंतर झाली.शेवटच्या २ दिवसात भगीरथ भालकेंनी सामान्य सर्मथक कार्यकर्त्याचे फोन न उचलने,वाटपाचे गबाळा खिशात घालून मतदान केंद्रावरील बुथवरून १ वाजताच तथाकथित आजी माजी ‘सेवक’ आणि याला पाडा असे फोन करण्यासाठी आपल्या हाती शब्दाला मान देणाऱ्या लोकांची यादी घेऊन बसलेले राष्ट्रवादी कॉग्रेसचे काही आजी माजी पदाधिकारी यांच्यामुळेच या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव झाला अशी चर्चा निकालानंतर झाली आणि विरली देखील.       

या पोटनिवडणुकीच्या प्रचारात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अक्षरश पाच पन्नास मतांचे मालक असलेल्या परंतु चर्चेत असलेल्या अनेक तथाकथित समाजसेवकांच्या भेटी घेत  विजया साठी सहकार्य करण्याची विनंती केली खरी पण त्यात ते अपयशी ठरले.आणि पंढरपूरचा पराभव राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जिव्हारी लागला.या निवणुकीत विरोधकांकडून विठठल सहकारी साखर कारखान्याची आर्थिक दुरवस्था हा टीकेचा महत्वपूर्ण मुद्दा ठरला असला तरी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी कारखाना बंद ठेवावा लागला आणि समोर स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या सारखे ऋषितुल्य उमेदवार समोर असताना देखील भारत भालकेंनी विजय संपादन केला होता.तर २०२१ च्या पोटनिवडणुकित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी बंद विठ्ठल कारखाना,थकेलेल ऊसबिले हाच प्रचाराचा मुख्य अजेंडा बनवला तरीही स्वाभिमानी शेतकरी संघटना फारसे मते मिळवू शकली नव्हती.   

 या पोटनिवडणुकी नंतर पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात राष्ट्रवादी आणखी बळकट होण्याऐवजी गटबाजीने खिळखिळी होत गेली.पंढरपूर तालुकाध्यक्ष बद्लारून दोन गटांनी आखलेली फाटी आणखी मोठी होत गेली.अशातच विविध पदाधीकारी निवडीवरून राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये मोठे आरोप प्रत्यारोप होत असले तरी स्वतः भगीरथ भालके मात्र या साऱ्या पक्षांर्तगत घडामोडीपासून अलिप्त रहात असल्याचे दिसून आले.मात्र याच वेळी पंढरपूर नगर पालिकेतील सर्व विरोधी गटाचे नगरसेवक तसेच तालुक्यातील आपल्या आपल्या गावात वर्चस्व राखून असलेले अनेक भालके सर्मथक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती व नगर पालिका निवडणुका या भगीरथ भालके यांच्याच नेत्तृत्वाखाली लढल्या जातील आणि पक्षातील विरोधकांची खरी ताकत काय आहे हे त्यावेळी दिसेलच अशी प्रतिक्रिया देताना दिसून येतात.    राष्ट्रवादी कॉगेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे हे नुकतेच पंढरपुरात आले असता सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला नाही हे उघडपणे मान्य करत यावर पक्षातील वरिष्ठानीच आता कठोर भूमिका घ्यावी अशी हतबलता व्यक्त केली आहे.       

२०२१ च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी राष्ट्रवादी कॉग्रेससह महाविकास आघाडीला आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि नगर पालिका निवडणुकीच्या निमित्ताने मिळणार आहे.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांची थकीत ऊसबिले आणि कामगारांचे थकलेले पगार या बाबत सातत्याने टीका होत असल्यानेच भगीरथ भालके हे पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात फारसे सक्रिय नसल्याचे दिसून आले असले तरी त्यांचे सर्मथक मात्र सतत आक्रमक भूमिका घेत व्यक्त होत असल्याचे दिसून आले आहे.   

पंढरपूर तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये भालके सर्मथक आणि युवराज पाटील,ऍडव्होकेट गणेश पाटील व दीपक पवार समर्थक असे दोन प्रबळ गट दिसून येतात.आगामी नगर पालिका निवडणुकीत शहराच्या राजकारणात युवराज पाटील आणि गणेश पाटील हे मतदारांवर फारसा प्रभाव टाकतील अशी शक्यता कमीच आहे.तर दीपक पवार यांचे राजकीय प्रभावक्षेत्र अतिशय मर्यादित आहे.मात्र याच वेळी भोसे आणि करकंब जिल्हा परिषद गटात ऍडव्होकेट गणेश पाटील हे आपला प्रभाव सिद्ध करतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.   

२०१४ पर्यंत राष्ट्रवादी कॉग्रेसची सोलापूर जिल्ह्यावर चांगली पकड होती.जिल्ह्यात सर्वाधिक आमदार हे राष्ट्रवादी कॉग्रेसचे राहिले आहेत.मात्र राष्ट्र्वादीतीलच एका गटाने वरिष्ठ नेत्याकडून मोहिते पाटील यांच्या विरोधात दंड थोपटण्यासाठी पाठबळ मिळाले आणि जिल्ह्यात पक्षाचा प्रभाव ओसरत गेला.२०१७ ला महाआघाडीने जिल्हा परिषद ताब्यात घेतली.जिल्हा बँक प्रशासकाच्या ताब्यात गेली.जिल्हा दूध संघ राजकीय प्रभावहीन झाला. जिल्ह्यात ७ आमदार आणि १ खासदार असलेला पक्ष केवळ २ आमदारावर येऊन ठेपला.पंढरपुर-मंगळवेढा मतदार संघाच्या २०१९ च्या निवडणुकीत स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या सारख्या ऋषितुल्य आणि दिग्गज नेत्याचा पराभव स्व.आ.भारत भालके यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पाठबळावर केला मात्र २०२१ च्या पोटनिवडणुकीत सभानुभूतीची लाट असताना भगीरथ भालकेंना निसटता पराभव पत्करावा लागला होता.या पराभवामागे आर्थिक आणि राजकीय अनेक कारणे दडली असली तरी गटबाजी आणि दगाबाजी हेही एक महत्वाचे कारण आहे असा आरोप भालके सर्मथक पदाधिकारी कायम करीत आले आहेत.आणी आगामी दोन्ही तालुक्यातील जि.प.पंचायत समिती व नगर पालिका निवडणुकीत या बाबतचा पूर्वानुभव लक्षात घेत राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वरिष्ठाना कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत.

सोमवारी  राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पंढरपुरात विधानसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहेत.हा आढावा घेत असताना ते पक्षातील गटबाजीवर शेवटचा जालीम उपाय करतील अशी अपेक्षा दोन्ही तालुक्यातील राष्ट्रवादी सर्मथक व्यक्त करत आहेत.सोमवारी संत तनपुरे महाराज मठ या ठिकाणी होणाऱ्या या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भूमिका मांडणार याकडे महाविकास आघाडीतील शिवसेना आणि कॉग्रेस या मित्रपक्षाच्या सर्मथकांचेही लक्ष लागले आहे.   

                               

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *