जालना तालुक्यातील मौजे पुणेगाव येथे एका वृद्धाचा जमिनीच्या वादातून मुलानेच काटा काढला. धक्कादायक म्हणजे चुलत बहिणीच्या मुलांनाच या नराधम मुलाने वडिलांच्या हत्येची सुपारी दिली.
या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात तपास लावला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब चव्हाण असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 5 जानेवारीला शेतात झोपायला गेल्यावर अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर चाकूने वार करून आणि लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला होता. या प्रकरणी पोलीस स्थानाकत कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी मयताचा मुलगा अरविंद भाऊसाहेब चव्हाण यास ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीमध्ये त्याने गुन्हा कबूल केला. गावातील शेत जमीन विक्रीच्या वादातून आरोपीने वडिलांचा काटा काढण्याचे ठरवले. चुलत बहिणीचे मुलं अनिल अर्जुन अंभोरे आणि सतिष अर्जुन अंभोरे यांना सोबत घेऊन खुनाची योजना आखली. मोबदल्यात एक लाख रुपये देण्याचे कबुल केले होते.
आरोपी अनिल अर्जुन, सतिष अर्जुन अंभोरे आणि अरविंद चव्हाण यांनी झोपेतच भाऊसाहेब चव्हाण यांचे तोंड दाबून चाकूने वार करुन त्यांचा खून केला. तिनही आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी तालुका जालना पोलीस ठाण्यात देण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड हे करीत आहेत.