स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला स्वस्त धान्य पुरवठा करता यावा म्हणून हि यंत्रणा अमलात आणली गेली.स्वस्त धान्य पुरवठ्या साठी केंद्र व राज्य सरकार वर्षाकाठी हजारो कोटी रुपये खर्च करते.मात्र पुरवठा विभागाला भ्रष्टाचाराची मोठी कीड लागली असून काही भ्रष्ट आणि राजकीय नेत्यांचा आशीवार्द असलेले स्वस्त धान्य दुकानदार भ्रष्ट अधिकाऱ्याच्या मदतीने गोरगरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेत असल्याच्या मोठ्या तक्रारी सातत्याने समोर येतात.या याबाबतच्या बातम्या लागतात आणि पुन्हा सारे काही सुरळीत सुरूच राहते.क्वचित प्रसंगी एखादा व्यक्ती या बाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करतो आणि स्वस्त धान्य दुकानदाराची चौकशी लागते.मात्र अशी चौकशीही अनेक वेळा भ्रष्ट शासकीय अधिकाऱ्यांसाठी संधी ठरत असून यातूनच मोठ्या रकमेचा मलिदा लाटून चौकशी दफतरबंद केली जाते असाही आरोप होत आला आहे.
असाच काहीसा प्रकार ३१ डिसेंबर २०२१ रोजी उघडकीस आला असून बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील एका स्वस्त धान्य दुकानदारा विरोधात सुरु असलेल्या चौकशीचा अहवाल सकारात्मक देण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदाराकडे १ लाख रुपये लाच मागून ती स्वीकारताना माजलगाव तहसील कार्यालयाचा नायब तहसीलदार एस.टी.कुंभार आणि खाजगी इसम अशोक नरवडे यांना १ लाख रुपये रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.