कोरोनाने मृत्यू झालेल्या वारसांना अर्ज करण्यासाठी मोफत नोंदणी सुविधा- तहसिलदार सुशिल बेल्हेकर
पंढरपूर दि. 08 :- कोरोना आजाराने मृत्यू पावलेल्या कुटूंबातील वारसांना 50 हजार रुपयांचे सानुग्रह सहाय्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अर्जासाठी शासनाने संकेतस्थळ विकसित केले असून, कुटूंबातील वारसांना अर्ज करताना कोणतेही अडचण येवू नये, यासाठी पंढरपूर तहसिल कार्यालय व तालुक्यातील सर्व महा-ई सेवा केंद्रावर दिनांक 11 व 12 डिसेंबर 2021 रोजी मोफत अर्जाची नोंदणी केली जाणार असल्याची माहिती तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली.
तालुक्यात कोरोना मुळे अनेक लोक बाधित झाले होते तर काही बाधितांचा मृत्यू झाला आहे. अनेक कुटूंबातील कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने या कुटुंबियांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या निर्देशानुसार व प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदशानाखाली पंढरपूर तहसिल कार्यालय, पंढरपूर व तालुक्यातील महा-ई-सेवा केंद्राचे सदस्य असलेल्या 56 केंद्रामध्ये अर्जदारांना अर्ज करण्यासाठी सुविधा मोफत उपलब्ध करण्यात आली आहे. कोरोना आजाराने मृत्यू पावलेल्या कुटूंबातील नातवाईकांनी दिनांक 11 व 12 डिसेंबर (शनिवार व रविवार) 2021 रोजी आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष हजर राहून अर्ज सादर करावेत, असे आवाहन तहसिलदार बेल्हेकर यांनी केले आहे.
सदर मदत आधार क्रमांकाव्दारे ओळख पटवून वारसांच्या थेट बँक खात्यात जमा होणार असल्याने. अर्जदाराने स्वत:तपशील, आधार नोंदणी क्रमांक, अर्जदाराचा स्वत:चा बॅक तपशील, बँकेचा रद्द चेक,कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा वैद्यकीय तपशील,आधार कार्ड, मृत्यू प्रमाणपत्र, तसेच निकटवर्तीय नातेवाईकांचे ना हरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र देणे बंधनकारक आहे. तरी या सुविधेचा संबधितांनी लाभ घ्यावा असे आवाहनही श्री.बेल्हेकर यांनी केले आहे. तसेच http://mahacovid19relief.in या संकेतस्थळावरुनही अर्ज करु शकता असे त्यांनी यावेळी सांगितले.