८ नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पंढरपुरात आले.पालखी मार्गाचे लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्याने माझ्यासह बहुतांश पंढरपूरकर समाधानी झाले.
पंढरीची वारी आहे माझ्या घरी ।
आणिक न करि तीर्थव्रत ।।
या संत तुकोबारायांच्या अभंगाला पिढ्यान पिढ्या प्रमाण मानत विठुरायाच्या वारीने समाधान पदरात पाडून घेणाऱ्या भाविकांचा पंढरपूरकडे येणार मार्ग सुखकर झाला याचा मलाही अतिशय आनंद वाटतो.अशातच ना.नितीन गडकरी यांनी वाखरी बायपास ते विठ्ठल मंदिर या रस्त्यासाठी ७४ कोटी रुपये मंजूर करत हेही काम लवकरच हाती घेण्याची घोषणा केली या बद्दल त्यांचे आणि या रस्त्याच्या कामाचा समावेश पालखी मार्गाच्या कामात व्हावा म्हणून पंढरपूरच्या विकासासाठी ज्यांच्याकडे अनेक महत्वपूर्ण योजना आहेत,प्रस्ताव आहेत अशा आमदार प्रशांत परिचारक यांचे नक्कीच मी मनपूर्वक आभार मानतो.
मी नेहमी सांगत आलो आहे कि पंढरपूरच्या सर्वागीण विकासासाठी पुढील दोन -तीन दशकाची गरज लक्षात घेवुन अशा विकास कामाचा आराखडा कागदावर नव्हे तर डोक्यात ठेवून पाठपुरावा करणारे नेतृत्व म्हणजे आमदार प्रशांत परिचारक हे होय.
पण याच वेळी माझी एक नाराजी कधीही लपविली नाही.. ती म्हणजे निकृष्ट पद्धीतीने होणारी विकास कामे,जी कामे केल्यानंतर अगदी काही दिवसात,महिन्यात त्या कामांची वाट लागलेली असते.
एप्रिल महिन्यात जेव्हा यात्रा अनुदानातून प्रदक्षिणा मार्ग कॉक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेत नगर पालिकेने निविदा काढल्या त्यावेळी माझ्या ताकतीनुसार मी त्यास कडाडून विरोध करत प्रदक्षिणा मार्ग कॉक्रीटीकरणाच्या कामातील आणि काम केल्यानंतर निर्माण होणाऱ्या अडचणी याचा उहापोह केला होता.पण त्याची दखल घेतली गेली नाही.
पण आता प्रदक्षिणा मार्गाचे कॉक्रीटीकरण रद्द करून डांबरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.कारणे तीच देण्यात आली जी मी सहा महिन्यापूर्वी मांडले होते.
फक्त एवढीच माफक अपेक्षा आहे.. सव्वादोन कोटी रुपये खर्चून डांबरीकरण करण्यात येणारा प्रदक्षिणा मार्ग निदान पुढील दोन वर्षे तरी सुस्थितीत रहावा.आणि राजकीय निष्ठा,पक्ष निष्ठा आदी बाबी बाजूला सारत या या भूवैकुंठ नगरीत करण्यात येणारी विकास कामे तकलादू होऊ नये अशी धारणा असलेली जे थोडेफार जागरूक नागिरक आहेत त्यांना हि एक संधी आहे.निकृष्ट पद्धतीने विकास कामे होत असतील तर आवाज उठविण्याची,आणि आणखीही एक कारण आहे,नगर पालिका निवडणुका समीप आल्या आहेत.कामे तर खूप सुरु केली जातील पण यापूर्वी केलेल्या कामाचा अनुभव आणि अवस्था लक्षात वास्तव मांडण्याची देखील एक संधी आहे.
कारण शहरातील इतर काही रस्त्यांचे असेच काम काम करण्यात आले आणि वर्षा-सहा महिन्यात त्याची वाट लागलेले दृश्य आम्ही याची देही याची डोळा अनुभवतो आहोत !
– राजकुमार शहापूरकर
(संपादक -पंढरी वार्ता )