गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतल्यानंतर राज्यात आता परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. सध्या परतीच्या पावसाने राज्यातील काही भागात पावसाने हाहाकार माजवला आहे.
अशातच आता कोकण, मध्य महाराष्ट्रातील उर्वरीत भागात 24 तासात जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने नागरिकांना दिला आहे.
येत्या 24 तासात राज्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पडणार आहे. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तसेच कोल्हापूर, पुणे, सातारा आणि वाशीममध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर शनिवारी 16 ऑक्टोंबरला वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपुर आणि गडचिरोली या भागातही पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
16 ते 17 ऑक्टोबर रोजी उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील परिसरासह वादळी वाऱ्याच्या वेगाने पाऊस पडणार आहे. विदर्भतील काही भागातही अशातच स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यात अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. गेल्या 24 तासात पुण्यासह, मुंबई परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला होता. आजही नवी मुंबईसह इतर परिसरात पाऊस झाला. राज्यातील इतर भागात 24 तासात विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस होणार असल्यामुळे नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचाही इशारा देण्यात आला आहे.