सावळ्या विठ्ठलाच्या भेटीसाठी लाखो भाविक पंढपुरात येत असतात.भूवैकुंठ समजल्या जाणाऱ्या या तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी आलेल्या भाविकांना कुठलीही समस्या जाणवू नये,या तिर्थक्षेत्राचा सर्वागीण विकास व्हावा म्हणून राज्य शासन पंढरपूरला निधी उपलब्ध करून देणयाबाबत कायम झुकते माप देत आले आहे.तर २००८ साली तात्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांनी संत तुकाराम महाराज जन्म चतुशताब्दी निमित्त विशेष आराखडा मंजूर करत २४० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली होती तर ३० वर्षांपूर्वी वार्षिक केवळ २५ लाख रुपये मिळणारे यात्रा अनुदान वाढत वाढत वार्षिक ५ कोटी करण्यात आले.गेल्या वर्षी चारही प्रमुख यात्रा भरल्या नसल्यातरी नगर पालिकेस शासनाकडून ५ कोटी यात्रा अनुदान प्राप्त झाले तर याही वेळी मुख्यमंत्र्यांनी ५ कोटी यात्रा अनुदानाचा चेक नगराध्यक्षा साधना भोसले याना सुपूर्त केला आहे.आता या वर्षीच्या यात्रा अनुदानाचा विनियोग कसा केला जाणार याकडे पंढरपूरकरांचे लक्ष लागले आहे.
यात्रा काळात व इतरवेळी येणाऱ्या भाविकांना सुविधा पुरविण्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानातून यात्रा काळात तात्पुरत्या स्वरूपातील स्वछतागृहे उभारणे,आरोग्य व सफाई कर्मचारी नियुक्त करणे,जंतुनाशके व इतर सुरक्षा साहित्य खरेदी करणे यासह भाविकांच्या दृष्टीने योग्य त्या सुविधा उपलब्ध करणे यासाठी या अनुदानाचा विनियोग करणे अपेक्षित असते.कोरोनाच्या पार्शवभूमीवर गेल्या वर्षी चारही प्रमख यात्रा भरल्या नाहीत तर याही वर्षी माघी,चैत्री आणि आता सर्वात मोठी वारी आषाढी भरली नाही त्यामुळे पंढरपुर शहराचे अर्थकारण ठप्प झाले आहे.यात्रा कालावधीत छोटे मोठे व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या मोठी असून रिक्षा,टांगा चालक,हॉटेल व्यवसायिक आदी व्यवसायही भाविकांच्या वर्दळीवर विसंबून आहेत.गतवर्षी पालिकेस प्राप्त झालेल्या यात्रा अनुदानाचा विनियोग शहरातील मालमत्ता धारकांना करमाफी देण्यासाठी अनुदानाच्या विनियोगाच्या अटी शिथिल कराव्यात या मागणीसाठी लोकप्रतिनिधी व महाविकास आघाडीतील स्थानिक नेते यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी अपेक्षा सामान्य नागिरक व्यक्त करत होते मात्र गतवर्षी प्राप्त ५ कोटीतुन जवळपास ३.५ कोटी खर्च करत नगर पालिकेने कालिकादेवी चौक ते नाथ चौक हा रस्ता कॉक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला तर नवीन कराड नाका परिसरातील रोडलाईट लावण्यासाठी ७० लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला.
संत तुकाराम भवन येथे पालकमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत बोलताना जिल्हा नियोजन समिती सदस्य भगीरथ भालके यांनी मागील ५ कोटी यात्रा अनुदान आणि यावर्षीचे ५ कोटी यात्रा अनुदान यातून शहरातील नागिरकांची घरपट्टी व पाणी पट्टी माफ करावी अशी मागणी केली होती.परंतु पालकमंत्र्यांनी याबाबत भाष्य केले नाही.आता एकादशी महापूजेस आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा ५ कोटी अनुदानाचा धनादेश प्रदान केला असून याचा तरी विनियोग शहरातील नागिरकांना मुन्सिपल टॅक्समध्ये सूट देण्यासाठी करण्यात येणार का व त्यासाठी शासनाकडून विशेष परवानगी मिळावी म्हणून पाठपुरावा केला जाणार का ? याकडे आता पंढरपूरकरांचे लक्ष लागले आहे.
तर या वर्षीच्या ५ कोटी यात्रा अनुदानातून तरी वारी आधारित अर्थकारण असलेल्या या शहरातील मालमत्ताधारकांना नगर पालिकेच्या पाणीपट्टी व घरपट्टीच्या करातून किमान ५० टक्के तरी माफी मिळावी यासाठी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आवाज उठवत शासनदरबारी अनुदान विनियोगाच्या अटी शिथिल करण्यासाठी पाठपुरावा करणार का ? याकडेही शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.