दिल्ली : केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या पत्राची दखल घेतली आहे. श्री. पवार यांना श्री. गौडा यांनी फोन करून लवकरच रासायनिक खतांच्या दरवाढीचा पुनर्विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.
कोरोना संकट काळात रासायनिक खतांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्याने देशभरातील शेतकरी अडचणीत सापडला. रासायनिक खतांचे वाढलेले दर केंद्र सरकारने कमी करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पत्राद्वारे केली होती.
केंद्रीय खत व रसायन मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांना याप्रकरणी वैयक्तिकरीत्या लक्ष घालण्याची आणि किमतीतील वाढ लवकरात लवकर मागे घेण्याची विनंती पवार यांनी मंगळवारी एका पत्राद्वारे मंत्री गौडा यांच्याकडे केली. या पत्राची दखल घेत केंद्रीय मंत्र्यांनी आज पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली. पत्रातील सूचनांचा अभ्यास करून पुढील दोन दिवसांत दरवाढ मागे घेण्याबाबतचा निर्णय घेऊ, असे त्यांनी श्री. पवार यांना आश्वासित केले.