भाजपतून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांना दोन वर्षे प्रतीक्षा करावीच लागेल. पक्ष वाढीसाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या त्यागाची किंमत त्यांना समजली पाहिजे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड केलं आहे.
अंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रविवारी कार्यकर्ता आढावा बैठक झाली. यावेळी जितेंद्र आव्हाड बोलत होते.
भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्यांवर विश्वास नाही, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. जिंतेद्र आव्हाडांच्या या वक्तव्यामुळे भाजपतून राष्ट्रवादीत आलेल्या पदाधिकाऱ्यांचे चेहरे पडल्याचं पहायला मिळालं.
राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना इडीने पाठवलेली नोटीस आणि साताऱ्यातील भर पावसातील प्रचारसभा यामुळे गेम चेंज झाला आणि राष्ट्रवादी पक्ष संपला म्हणणाऱ्या विरोधकांना चांगलीच चपराक बसली, असं खासदार सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.केंद्र सरकारची शेती आणि कामगार विरोधी धोरणे चिंताजनक असल्याचं म्हणत सुप्रिया सुळेंनी यावेळी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.