ताज्याघडामोडी

पक्ष कुठलाही असो आक्रमक ”जनसेवाच” तारणार

सुमारे अडीच दशके सोलापूर जिल्ह्यात अकलूज हे जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रस्थान होते.सोलापूर शहराच्या राजकारणात भलेही सुशीलकुमार शिंदे नाव प्रबळ होते.मात्र सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र मोहिते पाटील या नावाचा प्रचंड दबदबा होता.आणि अकलूज हि जिल्हयाची राजकीय राजधानी म्हणून ओळखली जात होती.सहकार महर्षी स्व.शंकरराव मोहिते पाटील यांचा राजकीय वारसा सर्मथपणे आणि अतिशय संयमाने पुढे नेण्यात माजी उपमुख्यमंत्री विजयसिह मोहिते पाटील हे यशस्वी ठरले होते तर सामान्य जनतेसाठी आक्रमक भूमिका घेत जागेवरच लोकांचे प्रश्न सोडविण्याची स्व.प्रतापसिह मोहिते पाटील यांची हातोटी त्यांना जिल्ह्याच्या राजकारणात मोठी लोकप्रियता मिळवून देणारी ठरली होती.सोलापूर जिल्हा युवक कॉग्रेसचे अध्यक्ष,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि जनसेवा संघटनेचे सर्वेसर्वा आधारस्तंभ म्हणून स्व.प्रतापसिह मोहिते पाटील यांनी पार पडलेली भूमिका सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात अविस्मरणीय ठरली आहे.   

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात स्व.प्रतापसिह मोहिते पाटील यांच्या छत्रछायेखाली वाटचाल करणाऱ्या जनसेवा संघटनेचा दबदबा इतका प्रचंड होता कि एखाद्या राजकीय पक्षाच्या पदापेक्षा जनसेवा संघटनेचे पद हे मोठे समजले जाऊ लागले होते.आणि आज सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात विविध पक्षात वावरणारे अनेक ”मोठे” नेते हे त्याकाळी जनसेवा संघटनेचे छोटे मोठे पद मिळाले तरी हुरळून जात होते हा इतिहास आहे.आणि या इतिहासाचा कालावधीही अगदी २५-३० वर्षांपूर्वीचा आहे.आणि यापाठीमागे एकच प्रबळ कारण होते ते म्हणजे स्व.प्रतापसिह मोहिते पाटील यांची आक्रमक भूमिका.त्यांच्याकडे काम घेऊन गेलेला कार्यकर्ता कधी निराश होऊन परतत नव्हता आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडे वाकड्या नजरेने पहायचे धाडस भले भले करत नव्हते हा दरारा होता.   

सहकार महर्षी स्व.शंकरराव मोहिते पाटील यांनी स्थापन केलेली जनसेवा संघटना पुढे आणखी समर्थपणे वाटचाल करू लागली ती स्व.प्रतापसिह मोहिते पाटील यांच्या सुरुवातीच्या राजकीय कारकिर्दीच्या काळात.जिल्ह्यातून,कुठल्याही कानाकोपऱ्यातून अडलेले,नडविलेले काम घेऊन येणाऱ्या सामान्य जनतेला मिळणारे बळ,सामान्य जनतेसाठी तळमळ असलेल्या कार्यकर्त्यांना मिळणारे पाठबळ आणि जर कुठे कुणी वळवळ केलीच तर त्याचा काढला जाणारा पीळ या तीनही वैशिष्टयामुळे स्व.प्रतापसिह मोहिते पाटील यांच्या इतकाच जनसेवा संघटनेच्या नावाचा दबदबा होता.आणि यापुढे पक्ष हि गौण बाब ठरली होती. 

आता स्व.प्रतापसिह मोहिते पाटील यांचे पुत्र डॉ. धवलसिह मोहिते पाटील त्यांचा राजकीय वारसा एकाकीपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत.माळशिरस तालुक्याच्या राजकारणात २००५ पर्यंत मोहिते पाटील समर्थक आणि मोहिते पाटील विरोधक हे दोनच राजकीय गट प्रबळपणे प्रत्येक निवडणुकीत समोरासमोर उभे ठाकत असत.पुढे मोहिते पाटील गटात तिरपी फूट पडत डॉ.धवलसिह मोहिते पाटील समर्थक गट वाटचाल करताना दिसून येतो आहे.मात्र धवलसिह मोहिते पाटील यांची ”पक्षनिती” राजकीय जाणकारांना मात्र कायम अवाक करत राहिली असून कधी शिवसेनेच्या नेत्याशी जवळीक,कधी राष्ट्रवादीच्या नेत्याच्या भेटीगाठी,कधी भाजपशी हातमिळवणी तर कधी जिल्ह्याच्या राजकरणात अकलूजकरांचे विरोधक समजल्या जाणाऱ्या आ.शिंदे गटाशी सलगी यामुळे धवलसिह मोहिते पाटील हे जरी जिल्हाच्या राजकारणात चर्चेत राहिले असले तरी निवडणुकीचा राजकारणात त्यांचे प्रभावक्षेत्र मर्यादित राहिले आहे.आणि आता धवलसिह मोहिते पाटील हे कॉग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने पुन्हा जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेत आले आहेत.      

मात्र स्व.प्रतापसिह मोहिते पाटील यांच्या कार्यपद्धतीवर आजही निरातिशय प्रेम केलेली जनता जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात आहे,डॉ.धवलसिह मोहिते पाटील यांचा पक्ष कुठला यापेक्षा ते सर्मथ राजकीय वारसा असलेले सुपुत्र आहेत.त्यांनी आमच्या भागातील सर्वसामान्य जनतेचे,गावकीतील राजकीय गटातटाच्या राजकारणात न्यायासाठी लढणाऱ्या ”पूर्वींप्रमाणे संपर्क वाढवावा,”तीच” आक्रमक भूमिका घेत प्रश्न मांडावेत,सोडवावेत लोक अजूनही स्व.प्रतापसिह मोहिते पाटील यांच्या कार्यपद्धतीच्या आठवणी काढतात त्यांना दिलासा द्यावा आम्ही तुम्हाला जिल्ह्यातून बळ देऊ मग तुम्ही माळशिरसचा गड नक्कीच सर कराल,मग तुमचा पक्ष कॉग्रेस असो कि आणखी कुठला अशी भावना व्यक्त करताना दिसून येत आहेत.               

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *