कोरोनाचा धोका असल्याने यंदा चैत्यभूमीवर गर्दी करू नका – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकरी जनतेला आवाहन
कोरोना हा संसर्गजन्य रोग असून या महामारिचा धोका अजून कमी झाला नसल्यामुळे यंदा 6 डिसेंबर ला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी वर गर्दी करू नका.या वर्षी घरी राहूनच आपल्या प्राणप्रिय मुक्तीदाते ; महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आंबेडकरी जनतेला केले आहे. मागील 8 महिन्यापासून कोरोना चा धोका जगात वाढत राहिला आहे. आता त्याचे प्रमाण कमी वाटत असले तरी धोका कायम आहे. कोरोनाचे संकट जीवघेणे आहे. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.कोरोना चा धोका वाढत असताना गर्दी करण्याचे दिवस नाहीत.त्यामुळे चैत्यभूमीवर होणारी गर्दी यावर्षी टाळली पाहिजे. यावर्षी गणेशोत्सव ; नवरात्रोत्सव; ईद ; दिवाळी सर्व सण गर्दी न करता साजरे झाले. त्यामुळे यंदा चैत्यभूमी वर गर्दी न करता घरी राहून ; आपल्या गावात ; महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला ; पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करावे.यावेळी सुरक्षित अंतर आणि मास्क चा वापर करावा आणि यंदा 6 डिसेंबर ला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी गर्दी न करता अभिवादन करावे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले आहे.