ताज्याघडामोडी

पंढरीत चार दिवस संचारबंदी बाबत काही प्रश्न !

पंढरीत चार दिवस संचारबंदी बाबत काही प्रश्न !

पोलीस प्रशासनाला आपल्या बंदोबस्तावर आणि ट्रिपल लेअर चेकपोस्टवर भरोसा नाही कि पंढरपूरकरांवर ?

१) शासनाने या वर्षीच्या आषाढी सोहळ्यासाठी कुठल्याही पायी दिंडी व पालखी सोहळ्यास परवानगी दिली नाही. मनाच्या पालखी सोहळ्यातील पादुका थेट हेलिकॉप्टरद्वारे पंढरपुरात दाखल होणार आहेत.
२) देहू आळंदी शिवाय राज्यातील अनेक गावातून पायी दिंडी सोहळे वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करतात पण यावर्षी राज्यातून एकाही गावातून एकही पायी दिंडी सोहळा पंढरपूरकडे रवाना झाला नाही.
३) आषाढी सोहळ्यासाठी येणारे बहुतांश भाविक हे राज्य परिवहन महामंडळाच्या बस,विशेष रेल्वे,खाजगी वाहने या द्वारे पंढपुरात येतात. या वर्षी राज्य परिवहन महामंडळ एकही विशेष एसटी बस पंढरपूरसाठी सोडणार नाही.
रेल्वेची प्रवासी वाहतूक बंदच आहे आणि यात्रा स्पेशल म्हणून एकही रेल्वेगाडी सोडली जाणार नाही.
खाजगी वाहने जिल्हा प्रवेश करताना अतिशय कडक तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे.आषाढी एकादशीसाठी भाविक पंढरपुरात येऊ नयेत म्हणून ट्रिपल लेअर (तिहेरी) तपासनी व्यवस्था (चेक पोस्ट) कार्यरत असल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला आहे.
अगदी एम.एच. १३ पासिंगची गाडी देखील शहरात प्रवेश करीत असेल तर चेकपोस्टवर ड्रायव्हिंग लायसेन्स सोबत आधार कार्डची देखील तपासणी केली जात आहे.
जिल्ह्यातूनच काही श्रद्धाळूं व अज्ञानी भाविक एकटे दुकटे भाविक चालत पंढरपूरकडे जाताना दिसून येतात त्यांना पोलीस प्रशासन जागोजागी अडवून परत पाठवत असल्याचे सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहे.
इतका सारा बंदोबस्त करून देखील प्रशासनाला पंढरीत मोठ्या संख्येने भाविक येतील असे वाटत असेल तर कशाचा आधारे याचा कुठलाही खुलासा न करता थेट पंढरपुरात चार दिवस संचारबंदीचा निर्णय घेणे म्हणजे पोलीस प्रशासनास सदैव सहकार्य करत आलेल्या,कुरकुर न करता त्यांचे सारे आदेश मानत आलेल्या पंढपुरकरावर अन्यायकारक आहे. आणि कदाचित पोलीस प्रशासनाचा आपल्याच ट्रिपल लेअर बंदोबस्तावर विश्वास नसल्याचे निदर्शक आहे.आणि मला स्पष्टपणे नमूद करावेसे वाटते जे लोक चार दिवस पंढरपूर बंदला पाठींबा देत आहेत त्यांचा बहुतेक पोलीस आणि प्रशासनाने पंढरपुरात अनधिकृत रित्या कुणीही प्रवेश करू नये म्हणून केलेल्या उपाय योजनेवर व विशेष बंदोबस्तावर विश्वास नसावा.
लक्षात घ्या,वारी आधारित अर्थकारण असलेल्या या तीर्थक्षेत्रांतील एकादशीला कुठे रस्त्यावर बसून तर कुठे तात्पुरते विविध वस्तू विक्रीचे दुकान टाकून,कुठे प्रासादिक वस्तूचे दुकान टाकून एकादशीला मंदिराच्या दिशेने पाहून हात जोडून नमस्कार करीत पांडुरंगा तुझ्या कृपेने आम्ही पोट भरत आहोत अशी भावना ठेवणारे अनेक अव्यक्त विठ्ठल भक्त आपण पाहिले आहेत.मात्र यावेळी कोरोनाच्या संकटामुळे पहिल्यांदा असे घडत आहे कि हा अव्यक्त भाविक या संकटाला संधी समजून चंद्रभागा स्नान,नगर प्रदक्षिणा, आणि परमात्मा पांडुरंगाचे आषाडी एकादशीला दर्शन भेटलेच तर या भूवैकुंठात जन्माला आलो याचे भाग्य उजविण्याचे स्वप्न पहात होता.
आपल्याकडे कोरोना आला नाही हि परमात्मा पांडुरंगाची कृपा अशी श्रद्धा व्यक्त करीत होता.(आणि गेल्या तीन महिन्यापासून प्रशासनास नेत्यांमध्ये सुरु असलेले राजकारण बाजूला सारून सर्वतोपरी पाठींबा देत होता).त्या या शहरातील नागिरकांवर केवळ पोलीस प्रशासनास तिहेरी चेकपोस्ट आणि बंदोबस्तासाठी मोठा फौंजफाटा मागवून सुद्धा भाविक शहरात प्रवेश करतील अशी भीती वाटत असल्यामुळे चार दिवस संचार बंदीचा निर्णय लादला जात आहे हे अन्यायकारक आहे !
म्हणून पोलीस प्रशासनास एक विनंती आहे,तुम्ही अनधिकृत रित्या या शहरात एकही बाहेरचा विठ्ठलभक्त भाविक दाखल होणार नाही याची दक्षता घ्या, आम्ही पंढरपूरकर तुम्हाला साथ देऊ !
पण वाईटात सुद्धा चांगले दडलेले असते या उक्तीप्रमाणे ग्रीनझोन मधील या शहरातील नागिरकांना चंद्रभागा स्नान,नगर प्रदक्षिणा,विठठल दर्शनाचा लाभ घेऊ द्या !
विशेष म्हणजे पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांनी नियोजित केलेल्या प्रत्येक उपयोजनेला कुठलाही आक्षेप न घेता पाठींबा दर्शविणाऱ्या नगर पालिकेच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांनीही या चार दिवसाच्या संचारबंदीला विरोध केला आहे आणि त्यामुळे प्रथमच विसंवाद उघड झाला आहे.
मंदिर समितीचे सदस्यपद मिळावे म्हणून कोरोना नसतानाही या शहरात पालखी प्रवेश रोखणारे वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेचे जळगावकर हे याच शहराचे नागिरक आहेत,ते इतर अनेक वेळीही बोटचेपी व सर्वांचे ” समाधान” करत असल्याचा आव आणणारी भुमीका घेतातच यावेळी ते काय भुमीका घेतात याकडे या शहरातील विठ्ठलभक्तांचे लक्ष लागून राहिले आहे.

– राजकुमार शहापूरकर
(संपादक पंढरी वार्ता)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *