प्रेमप्रकरणं, आर्थिक व्यवहार किंवा कर्ज प्रकरणातून गंभीर गुन्हे घडत असतात. बिहारमधल्या जमुईत अशाच एका कारणावरून एका विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी मृत युवकाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोस्टमॉर्टेमचा अहवाल आल्यावर अनेक गोष्टी स्पष्ट होतील, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
जमुईतल्या टाउन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरडीहमध्ये एका विद्यार्थ्याला ओलीस ठेवून बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी (28 डिसेंबर) सकाळी पोलिसांनी नरडीहमधल्या सुनील शर्मा यांच्या घरातून विद्यार्थ्याचा अर्धनग्न अवस्थेतला मृतदेह ताब्यात घेतला. विद्यार्थ्याच्या शरीरावर जखमेच्या खुणा आढळून आल्या. त्याच्यासोबत शिकणाऱ्या एका मुलीच्या घरात त्याचा मृतदेह सापडला. काही जण या हत्येकडे प्रेमप्रकरणाच्या दृष्टीने बघत आहेत; मात्र यामागचं कारण वेगळं असल्याचं विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.
या प्रकरणाविषयी जमुईचे एसडीपीओ सतीश सुमन यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की ‘गुरुवारी सकाळी हत्येविषयी माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पुढची कारवाई सुरू आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. चौकशी सुरू आहे. एफएसएलचं पथक बोलावलं आहे. पोस्टमॉर्टेमचा अहवाल आल्यानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील. प्रेमसंबंधाच्या अँगलविषयी बोलायचं झालं तर आमच्यासाठी हा फक्त हत्येचा गुन्हा आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू आहे.’