हुंडा देणे आणि घेणे या प्रथेला कायद्याने बंधन घातलेले असले तरी अजूनही हुंडा प्रथा बंद नसून या प्रथेने आजही अनेक विवाहित मुली मृत्यूच्या सापळ्यात अडकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तशीच एक घटना बीड जिल्ह्यात पुढे आली आहे. “हुंड्यासाठी छळ होतोय पप्पा, हुंडा न दिल्याने मला मारहाण होतीये” असं वडिलांशी बोलून मुलीने चक्क गळफास घेतल्याची हृदयद्रावक घटना अंबाजोगाई तालुक्यातील साळुंकवाडीत घडली आहे.
“पप्पा तुम्ही लग्नात हुंडा दिला नाही, म्हणून हे लोक मला मारहाण करत आहेत, खूप त्रास होतोय”, अशी व्यथा वडिलांच्या गळ्यात पडून आपल्या लेकीनं सांगितली. मात्र, काही तासातच त्याच लेकीनं टोकाचं पाऊल उचलत गळफास घेत आत्महत्या केली. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील साळुंकेवाडी येथील ही धक्कादाय घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पतीसह चौघांविरोधात बर्दापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील सावंतवाडी येथील मेघा निखिल कर्वे (वय, २२ रा. साळुंकवाडी तालुका अंबाजोगाई) असं मयत झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
मेघाचं लग्न २१ मे २०२२ रोजी साळुंकवाडी येथील निखिल कर्वे यांच्यासोबत झालं होतं. मात्र, लग्नानंतर दोन महिने ते तीन महिने त्या दोघांनी सुखाने संसार केला. त्यानंतर हुंड्याचं खूळ हे नवऱ्याच्या डोक्यात घुसलं आणि यातच तिला त्रास देणं सुरु झालं. “पिकप आणि सोन्याचे लॉकेट घेण्यासाठी तीन लाख रुपये माहेरून घेऊन ये”, असं म्हणत तिला वारंवार त्रास देऊ लागले. तिचा नवार तिला मारहाण देखील करु लागला.
जेव्हा हा त्रास नकोसा झाला. त्यावेळी हा संपूर्ण प्रकार मेघाने आपल्या वडिलांना सांगितला. “पैशांसाठी मला खूप त्रास होत आहे. तुम्ही लग्नात हुंडा दिला नाही, म्हणून हे लोक मला मारत आहेत”. मेघाची सर्व आपबीती ऐकल्यानंतर तिच्या वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर काही तासातच मेघाने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं.