ताज्याघडामोडी

प्रेयसीबद्दल अपशब्द उच्चारल्याच्या रागातून मुलाने केला वडिलांचा खून, दोन सख्ख्या भावांना अटक

प्रेयसी बाबत वडिलांनी अपशब्द उच्चारल्याच्या रागातून मुलाने वडिलांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर वडिलांनी आत्महत्या केल्याचा बनाव रचला.मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात सत्य समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करुन दोन भावांना अटक केली आहे. हा प्रकार दिघी येथे रविवारी (दि.5) रात्री नऊच्या सुमारास घडला आहे.

अशोक रामदास जाधव (वय-45 रा. दिघी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मृताची पत्नी, मोठा मुलगा राहूल अशोक जाधव (वय-25), लहान मुलगा अनिल अशोक जाधव (वय-23) यांच्यावर आयपीसी 302, 201, 34 नुसार गुन्हा दाखल करुन राहूल आणि अनिल याला अटक केली आहे. याबाबत अशोक काशीनाथ खंडाळे (वय-55) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध आहेत.मयत अशोक जाधव यांनी अनिलच्या प्रेयसीबाबत अपशब्द उच्चारले होते.याचा राग मनात धरुन अनिल याने वडिलांचा गळा आवळून खून केला.यावेळी अशोक यांच्या नाका तोंडातून फरशीवर रक्त पडले.मयत अशोक यांच्या पत्नीने पुरावा नष्ट करण्यासाठी फरशीवर पडलेले रक्त आणि शर्ट नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

तर राहूल याने घरातील फॅनला दोरी गुंडाळून वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला. पोलिसांनी केलेल्या तपासात अशोक जाधव यांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *