‘नारायण राणेंकडे असलेल्या पीएने या मंत्रालयाच्या माध्यमातून अनेकांना गंडे घातले. पंतप्रधान मोदींना हे जेव्हा कळले तेव्हा त्यांनी राणेंना समज दिली.
पीएला आधी हाकला नाहीतर तुमचं मंत्रिपद काढून घेणार, असा इशारा दिला असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. कणकवली इथं नवनिर्वाचित सरपंचांच्या सत्कार कार्यक्रम पार पडला. यावेळी विनायक राऊत, आमदार वैभव नाईक हजर होते. यावेळी राऊत यांनी दिल्लीतील गोष्टीचा मोठा खुलासा केला.
‘मागच्या अधिवेशनामध्ये केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केरळच्या प्रश्नाला तामिळनाडूचे उत्तर दिले होते. या प्रकारानंतर राणे लोकसभेची पायरी चढायचेच विसरले. राणे अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासालाही उपस्थित राहत नाहीत, अशी खरमरीत टीका शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेवंर केली आहे. ‘मध्यल्या काळात त्यांनी एक पीए ठेवला होता.
पीएची काम ही फक्त पटवापटवीची होती. अनेकांना त्याने गंडा घातला. मोदी साहेबांच्या हे लक्षात आलं. त्यावेळी, या पीएला आधी हाकलून द्या, नाहीतर मंत्रिपद काढून घेईन, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी नारायण राणेंना झापलं होतं, असा खुलासा विनायक राऊत यांनी केला.