एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेशी फारकत घेतली आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली.बंडखोरी आणि सत्तास्थापनेच्या मधल्या काळात ठाकरेगट आणि शिंदेगट पुन्हा एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले गेले किंवा या दोघांनी एकत्र येण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात व्यक्त केली गेली.पण शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर ही शक्यता मावळली. पण आता हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येण्याची शक्यता शिंदेगटातील मंत्र्यानेच व्यक्त केली आहे. त्यासाठी ठाकरेंसमोर एक अट ठेवण्यात आली आहे.शिंदेगटाचे नेते आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंसमोर एक अट ठेवली आहे. ते शिर्डीत बोलत होते.
आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे लोक आहोत. बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी लोकं सहजासहजी सोडून जात नाहीत. त्यामुळे काहीतरी निश्चितपणे असं घडलेलं आहे, ज्यामुळे लोक नाराज झाली आणि बाहेर पडली. ती गोष्ट नेमकी काय घडली याचं आत्मपरिक्षण जसं मी केलं तसं उद्धव ठाकरे यांनीही त्याचं आत्मपरिक्षण करावं. जर त्यांनी आत्मपरिक्षण केलं तर शिवसेना एकसंध व्हायला वेळ लागणार नाही, असं केसरकर म्हणालेत.