उत्तरप्रदेशात एक संतापजनक घटना घडली आहे. एका माथेफिरु मुख्याध्यापकाने 5 मिनीटे शाळेत उशीरा आलेल्या विद्यार्थ्याला पायाची हाडं तुटेपर्यंत बेदम मारले. पिडीत मुलाच्या वडिलांनी मुख्याध्यापकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.त्याचबरोबर जिल्हाअधिकाऱ्यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे.
ही घटना शामली येथील मुंडेट गावातील आहे. सुधीर कुमार राणा असे त्या माथेफिरु मुख्याध्यापकाचे नाव आहे. जय जवान जय किसान इंटर कॉलेजचे मुख्याध्यापकाने देवल नावाचा विद्यार्थी पाच मिनीटे शाळेत उशीरा पोहोचल्याने त्याला बेदम मारले. त्या लहान मुलाला एवढे मारले की, त्याच्या दोन्ही पायाची हाडे तुटली. पिडीत मुलाच्या वडिलांनी सांगितले की, देवल आठवीत शिकत असून मागच्या काही दिवसांपासून आजारी होता.
वडिलांनी पुढे सांगितले की, मी माझ्या मुलाचे उपचार पानीपतमध्ये केले आहेत. आजारपणातून तो बरा झाल्यानंतर माझ्या मुलाला शाळेत घेऊन गेलो. पानीपतच्या रुग्णालयातील त्याची कागदपत्रे मुख्याध्यापक सुधीर कुमार राणा यांना दाखवून त्याला शाळेत बसवले होते. दुसऱ्या दिवशी देवल शाळेत 5 मिनीटे उशीरा आल्याने त्याला निर्दयीपणे मारले. त्यानंतर सरकारी रुग्णालयात शामलीमध्ये माझ्या मुलाच्या पायांचे एक्स-रे केले.
त्यावेळी दोन्ही पायाची हाडे तुटल्याचे समोर आले. मुलाच्या दोन्ही पायांना प्लास्टर केले आहे. पिडीत मुलाच्या वडिलांनी मुख्याध्यापकाविरोधात कारवाई केली आहे. तर देवलच्या म्हणण्यानुसार, मुख्याध्यापकांनी त्यांची काही म्हणणे ऐकून न घेता त्याला बेदम मारले. याप्रकरणी डीएम जीत कौर यांच्या म्हणण्यानुसार, याप्रकरणी एसडीएम आणि सीओ एडीआयओएसची एक टीम तयार केली आहे. यामध्ये मुख्याध्यापक दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.