ताज्याघडामोडी

पावसाचं राज्यात लवकरच आगमन, ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता

येत्या 24 तासात मान्सून पाऊस अंदमानात दाखल होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. आज अनुकूल स्थिती असल्यामुळे मान्सून पावसाचं (नैऋत्य मोसमी वारे) अंदमान समुद्र, निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरातील दक्षिणपूर्व भागात आगमन होऊ शकतं. त्यातच केरळच्या किनारपट्टीवर येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मान्सूनची प्रगती वेगानं होत आहे. त्यामुळे मान्सून 24 तासांत अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं ही माहिती दिली आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, येत्या पाच दिवसांत जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

राज्यातल्या काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यातच मध्यरात्री भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. भंडारा जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाने चांगलाच झोडपलं आहे. जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात रात्री 12 च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पीक हंगामात धान पिकांची लागवड केली असून धान पीक कापणीला आला आहे. त्यामुळे धान पिकांना या अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

राज्यातल्या ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या मध्य महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांना आणि परभणी, हिंगोली नांदेड, लातूर, उस्मानाबाद या नऊ जिल्ह्यांना 16 ते 19 मे रोजीपर्यंत चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

दरम्यान रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड या चार जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होईल, अशी शक्यताही वर्तवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *