गुन्हे विश्व

वसुली करणाऱ्या 3 पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

जगाने दखल घेतलेल्या मुंबई पोलिसांच्या प्रतिमेवर मागील काही अनेक दिवसांपासून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अँटिलियाची घटना किंवा मनसुख खून प्रकरणानंतर असे प्रकार घडू नयेत, यासाठी मुंबई पोलिस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी ठोस पाऊल उचलली आहेत. कर्तव्याच्या नावाखाली पोलीस अधिकारी पैसे उकळत असल्याचे लक्षात येताच, त्यांनी चौकशी सुरू केली. याप्रकरणात दोषी आढळलेल्या आधिकाऱ्यांवर वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान वसुलीचा गुन्हा पोलीस निरीक्षक ओम वनघाटे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम आणि पोलीस उपनिरीक्षक समाधान जामठाडे या तीन पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. सध्या एलटी मार्ग पोलीस ठाण्यात हे तीन अधिकारी कार्यरत होते, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

हे तिन्ही अधिकारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत लहान-मोठ्या व्यापाऱ्यांकडून पैसे उकळायचे. दरम्यान, काही व्यापाऱ्यांनी या वसुलीमुळे नाराज होऊन जानेवारी महिन्यात पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार केली होती. व्यापाऱ्यांनी केलेल्या तक्रारीत संबंधित झोनचे डीसीपी सौरभ त्रिपाठी यांचेही नाव होते. यानंतर आयुक्त नगराळे यांनी अतिरिक्त आयुक्त दक्षिण विभागीय आयुक्त दिलीप सावंत यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले.

याप्रकरणी दिलीप सावंत यांनी चौकशी केली असता तीन पोलीस अधिकारी वसुलीसाठी सक्रिय असल्याचे त्यांच्या तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर तिघांविरुद्ध एलटी मार्ग पोलीस ठाण्यात वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 384 आणि 392 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात डीसीपी सौरभ त्रिपाठी यांच्यावरही वसुलीचा आरोप होता. पण, तपासात त्यांच्याविरुद्ध काहीही निष्पन्न झाले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *