राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. रिफायनरी प्रकल्पाबाबत विरोधी भूमिका घेतल्याने राजन साळवी यांना धमकीचा फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
‘रिफायनरी का काम मत रोकना, बुरा हो जाएगा, चल फोन रख’, असे सांगत राजन साळवी यांना धमकी देण्यात आली. आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत विरोधी भूमिका घेतल्याने त्यांना आणि त्यांच्या कुटूंबियांना मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. याबाबत आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणाची दखल घेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना तातडीने पत्र लिहून साळवी यांना धमकी देणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
ते म्हणाले, ‘राजन साळवी हे कडवे शिवसैनिक आहेत. असल्या फुसक्या धमक्यांन ते घाबरणारे नाहीत. आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत,’ असे ते म्हणाले.