अगदी सिनेमांतील एखादा सीन वाटावा अशी घटना कल्याण पूर्वे येथे घडली आहे. कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत काटेमानेवली नाका ते चिंचपाडा रोडवर कर्तव्य बजावणाऱ्या 3 पोलिसांनी धाडस आणि प्रसंगावधान दाखवत चाकू हल्ल्यातून दोघा जणांचे प्राण वाचवले आहेत.
पोलिसांनी जीवाची पर्वा न करता मोठ्या धाडसाने हल्लेंखोरांच्या तावडीतून दोघांना वाचवलं आहे. अटक करण्यात आलेल्याचे नाव मयूर रामदास दराडे असे असून जखमी तरुणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. क्षुल्लक कारणावरुन हा वाद झाल्याचे समोर आले आहे.
नेमकं काय घडलं?
कोळसेवाडी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी प्रवीण देवरे, उत्तम खरात आणि कुणाल परदेशी हे काटेमानिवली नाका ते चिचंपाडा रोडवर कर्तव्य बजावत होते. या भागात ज्या दुकानदारांनी सीसीटीव्ही लावले नाहीl. त्यांनी सीसीटीव्ही लावण्यासाठी संबधित पोलिस दुकानदारांना भेटून आवाहन करत होते. यावेळी त्यांना काटेमानेवली ते चिंचपाडा रोडवर गर्दी दिसून आली.
त्यावेळी तिघांनी पुढे जाऊन पाहिले असता एक इसम हातात चाकू घेऊन दोन जणांवर हल्ला करत असल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहताच तिन्ही पोलिसांनी जीवाची पर्वा न करता अत्यंत शिताफीने आरोपीच्या हातून चाकू काढत त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला अटक करुन पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.
ओव्हरटेक करण्यावरुन वाद
आरोपीचे नाव मयूर रामदास दराडे असून हल्ला झालेल्या तरुणांची नावे विशाल पाटील आणि दिपेश रसाळ अशी आहेत. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा वाद ओव्हरटेक करण्याच्या वादातून झाल्याचे समोर आले आहे.
यावेळी मयूरने दोघांसोबत वाद घालत चाकूने हल्ला केल्याचे समोर आले आहे. दरम्यान संबधित पोलिसांच्या सतर्कतेसह धाडसामुळे त्यांचे अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी कौतुक केले आहे.