ज्ञानोबा तुकाराम आदी संतांच्या काळातील म्हणजे 700 वर्षांपूर्वीचं विठ्ठल मंदिर कसं असेल? याची सगळ्यांनाच उत्कंठा लागून राहिली आहे. अशातच आता पुरातत्व विभागानं दिलेल्या विकास आराखड्याला मंदिर समितीनं मंजुरी देत तो आराखडा राज्य शासनाकडे पाठवला आहे. येत्या 5 वर्षांत हे काम पूर्ण करण्याचं नियोजन आहे. विठुरायाच्या बाबतीत नाही, घडविला नाही बैसविला ही मान्यता वारकरी संप्रदायाची आहे. विठ्ठल मंदिर हे 11व्या शतकातील असल्याचं अभ्यासक मनात असले, तरी त्याहीपूर्वीपासून विठुरायाचे हे पंढरपुरातील मंदिर अस्तित्वात असल्याचं काही अभ्यासकांचे मत आहे .
आता पुन्हा 700 वर्षांपूर्वीचे मूळ मंदिराप्रमाणे या मंदिराला रूप देण्यासाठी हा आराखडा बनविला असून पुरातत्व विभागाने गेल्या दोन वर्षांपासून याचा आराखडा बनविण्याचे काम केलं होतं. आता हे काम पूर्ण झालं असून यासाठी 61 कोटी 50 लाखांचा आराखडा मंदिर समितीकडे सोपवला होता. मंदिर समितीनं नुकत्याच झालेल्या बैठकीत या आराखड्याला मंजुरी दिली आहे. आता हा अंतिम आराखडा मंजुरीसाठी विधी आणि न्याय विभागाकडे पाठविला आहे. या आराखड्यानुसार, विठुरायाच्या मंदिराचं काम पाच टप्प्यात केलं जाणार आहे. यात मंदिराला मूळ हेमाडपंथी रूप देण्यासाठी जिथं दगडांची झीज झाली आहे, अशा ठिकाणी रासायनिक संवर्धन केलं जाणार आहे. याशिवाय मंदिराचं आयुष्य वाढविण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात मजबुतीकरणाचं काम केलं जाणार आहे. विठ्ठल मूर्तीला हानिकारक असलेले गाभाऱ्यात बसविलेले ग्रॅनाईट हटवून त्यामागील दगडी बांधकाम मूळ स्वरूपात आणलं जाणार आहे