महाविकास आघाडीविरोधात भाजपने विदर्भात आंदोलन पुकारले आहे. भाजपच्या आंदोलनावेळी सभेत बोलताना विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल चढवल्याचे दिसून आले आहे. कोरोना काळातील वाढीव वीजबिलांवर राज्य सरकारने आधी दिलासा देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, यानंतर राज्य सरकारने यु-टर्न घेतल्याचं दिसून आल्यानंतर मनसे व भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, वीजबिल न भरल्यास वीज कापण्यात येईल असं महावितरणतर्फे सांगण्यात आलं आहे.
याच मुद्द्यावर फडणवीसांनी हात घालत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘ सामान्य नागरिकांना वीजबिल माफी देण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे नाहीत. मग या सरकारने मुंबई व पुण्यातील बिल्डरांना प्रीमियममध्ये सूट देण्यासाठी 5 हजार कोटी रुपये कुठून आणले ? कोणत्याही गावात अधिकारी वीज जोडणी तोडण्यासाठी आल्यास त्यांना गुलाबाचं फुल द्या आणि गाडीत बसून परत पाठवा’ असं गांधीगिरीचं आवाहन देखील फडणवीसांनी यावेळी केलं आहे. तर, ‘कुणाचीही वीज कापण्याची सक्ती कुणाला करू देणार नाही, ही जबाबदारी भाजपाच्या कार्यकर्त्यांची आहे,’ असं आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे.