पोहोरगावातील दिव्यांग पूरग्रस्तांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांनी दिला मदतीचा हात
पंढरपूर: ‘सुरवातीला कोरोना, त्यानंतर नैसर्गिक अतिवृष्टी यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांचे झालेले अतोनात नुकसान पाहून शिक्षणतज्ञ म्हणून राज्यात ओळख असलेल्या स्वेरीच्या डॉ. बी.पी. रोंगे सरांनी ऐनवेळी केलेली अन्नधान्याची मदत लाख मोलाची आहे. तंत्रशिक्षणातील कार्यासोबतच डॉ. रोंगे सरांच्या सामाजिक कार्याचे देखील अनुकरण करणे सध्या आवश्यक आहे.’ असे प्रतिपादन बळीराम गायकवाड यांनी केले.
पोहोरगाव (ता. पंढरपूर) मधील दिव्यांग पुनर्वसन व मार्गदर्शन केंद्रातील महापूर व अतीवृष्टीने बाधित झालेले दिव्यांग (अपंग) नागरिक व त्यांच्या कुटुंबियांना मदत करून डॉ. रोंगे सरांनी ‘माणुसकी अजून जिवंत आहे’ हेच दाखवून दिले आहे. गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूरचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी पोहोरगावातील दिव्यांग नागरिकांना अन्नधान्याच्या कीटचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. प्रास्ताविकात शंकर पवार म्हणाले की, ‘दुष्काळ, कोरोना, महापूर, इ. कारणामुळे पोहोरगावातील बहुसंख्य शेतकरी अडचणीत आलेले आहेत. सध्याची परिस्थती नाजूक असून पुरामुळे शेतीचे ऐंशी ते नव्वद टक्के नुकसान झाले आहे. जनावरे दगावली, अवजारे वाहून गेली, साहित्यांचे नुकसान झाले. अशा वाईट काळात डॉ. रोंगे सरांनी मदतीचा हात पुढे केलेला आहे ही खूप मोलाची गोष्ट आहे.’ यावेळी स्वेरीचे डॉ. बी.पी.रोंगे म्हणाले की, ‘सध्याच्या परिस्थितीला तोंड देत पूरग्रस्तांनी आलेल्या संकटावर मात करायची आहे. त्यामुळे संयम बाळगा. आपल्याकडून थोडीफार मदत व्हावी या भावनेने मी इथं आलो आहे. त्याचप्रमाणे सध्याची परिस्थती पाहता गरजू पूरग्रस्तांच्या पाल्यांना ‘कमवा व शिका‘ योजनेतून स्वेरीमधील अभियांत्रिकी, फार्मसी व एम.बी.ए. या पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी शिक्षण देण्यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल.’ असेही डॉ. रोंगे यांनी सांगितले. यावेळी दिव्यांग, अस्थीव्यंग व मतीमंद असलेल्या पूरग्रस्त कुटुंबियांना अन्नधान्याच्या कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी सिद्धेश्वर गायकवाड, माजी सरपंच विलास गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, योगेश चव्हाण, श्रीकांत चव्हाण, अमोल गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.