खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथील शेतकरी तरुणाला मुलगी मिळत नसल्यामुळे एका मध्यस्थीच्या माध्यमातून दोन लाख रुपये देऊन लग्न केले. मात्र, २० दिवसातच नववधूने दागिने तसेच नवीन घेतलेली मोटरसायकल घेऊन साथीदारासह समृद्धी महामार्गाने पोबारा केला. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी या गावातील शेतकरी कुटुंबातील एका तरुणाला लग्न करण्यासाठी मुलगी मिळत नव्हती. यावेळी एका मध्यस्थी व्यक्तीने लग्नासाठी स्थळ असल्याचं सांगितलं. नागपूर येथील मुलगी असून तिचे फोटो मुलाला दाखवले. फोटोमध्ये दाखवण्यात आलेली मुलगी सुंदर असल्यामुळे मुलाकडची मंडळी लग्नासाठी तयार झाली.
मात्र, मुलीकडील कुटुंब गरीब असल्यामुळे त्यांना लग्न करण्यासाठी दोन लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. मुलाकडील कुटुंबियांना विश्वास बसल्यामुळे त्यांनी पैसे देण्यास होकार देऊन पैसे दिले. दरम्यान. ठरल्यानुसार २० दिवसांपूर्वी तरुणांचा विवाह वेरूळ येथे मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला. यावेळी मुलाचा विवाह असल्यामुळे मुलाकडील मंडळींनी मुलीच्या अंगावर दाग दागिने घातले होते.
लग्नानंतर नववधू २० दिवस गोण्यागोविंदाने राहिले. मात्र, १८ ऑगस्ट रोजी पतीने घेतलेली मोटरसायकलची चावी घेऊन ती स्वतः दुचाकीवर बसली यावेळी स्वतः दुचाकी चालवत पुढे गेली. त्यानंतर साथीदाराला मोटरसायकलवर बसवत नागपूरच्या दिशेने समृद्धी महामार्गावरून पसार झाली. दरम्यान, ही संपूर्ण घटना समृद्धी महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.