ताज्याघडामोडी

राज्य सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा अखेर मुहूर्त ठरला, नव्या चेहऱ्यांना संधी

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सर्वात मोठी बातमी समोर आलीय. भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या एका विधानामुळे शिंदे-फडणवीस सरकार कोसळून राज्यात मध्यावधी निवडणुका लागतात की काय? अशा चर्चांना उधाण आलं असताना एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. राज्यात सत्तांतर होऊन जवळपास चार महिने होत आले तरी नव्या सरकारचं दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झालेलं नाही. त्यामुळे विरोधकांकडूनही राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जातोय. पण आता राज्य सरकारनेच याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सर्व 50 आमदार दोन दिवस गुवाहाटीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते गुवाहाटीला जाऊन कामाख्यादेवीचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते पुन्हा महाराष्ट्रात परतल्यावर लगेच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलीय.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्तारात आता नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. तसेच मंत्रीपद मिळालं नाही म्हणून नाराज होणाऱ्या आमदारांना महामंडळ देण्याचा शिंदे सरकारचा प्लॅन असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.

एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह येत्या 26 नोव्हेंबरला पुन्हा गुवाहाटीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. गुवाहाटीहून आल्यावर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा मंत्रीमंडळाचा विस्तार होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *