ताज्याघडामोडी

प्रेम संबधास विरोध करणाऱ्या पत्नीसह मुलींना जिवंत जाळले

पतीच्या प्रेम संबंधाना विरोध करणाऱ्या पत्नीसह दोन मुलींना घराला आग लावून जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला असून दोन मुली गंभीर रित्या होरपळल्या होत्या. त्यांचा आज आई पाठोपाठ उपचार सुरु असताना मृत्यू झाला. ही घटना कल्याण तालुक्यातील भोपर गावात घडली. प्रसाद पाटील असे आरोपीचे पतीचे नाव आहे. तर प्रीती (वय ३५) समीरा (१४), समीक्षा (११) असे आगीत होरपळून मृत्यू झालेल्या माय लेकींचे नावे आहे.

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात असलेल्या वाशी सरेभाग येथील रहिवासी असलेल्या मृत प्रीती हिचा विवाह २००७ मध्ये भोपर गावातील प्रसाद पाटील याच्याशी पार पडला होता. त्यांना विवाहनंतर दोन मुली झाल्या आहेत. त्यातच आरोपी पती प्रसादचे एका परस्त्रीशी प्रेम संबंध असल्याचे पत्नीच्या निर्दशनास आल्याने तिने पतीला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थिती नव्हता. त्यानंतर तो पत्नीला शारीरिक मानसिक त्रास देऊ लागला. तर मुलींना नियमित मारझोड करू लागला, असे मृतक प्रीतीचा भाऊ किशोर पाटील यांनी पोलीस ठाण्यात तक्रारीत नमूद केले आहे.

आरोपी प्रसाद याने सुखाने संसार करावा म्हणून त्याला वेळोवेळी समजविण्यात आले होते. गेल्या आठ दिवसापूर्वी प्रीतीच्या माहेरच्या मंडळींनी भोपर येथे येऊन प्रसादची समजूत घालून त्यांना सुखाने राहण्याचे समजावले होते. परंतु यावेळी प्रसाद याने प्रीतीच्या माहेरहून आलेल्या मंडळींना धमकावले. तुम्ही या भानगडीत पडू नका असा इशारा त्यांने दिला होता. तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी त्याने दिली होती. तर मृत प्रीती, तिच्या दोन्ही मुलींनी प्रसाद पासून आपल्या जीवाला धोका असल्याचे माहेरच्या लोकांना सांगितले होते.

अनेक वेळा प्रसाद चार पाच दिवस घरी येत नाही, असे प्रीती सांगत होती, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात अंतीम तडजोड करण्यासाठी किशोर पाटील, प्रसाद यांनी ठरविले होते. त्यावेळी प्रसाद आता नवरात्र चालू आहे त्यानंतर आपण भेटू किशोर यांना सांगितले. ही संधी साधत आरोपी पतीने शनिवारी सकाळच्या सुमारास स्वतःच्या घराला आग लावून पत्नी प्रीती, तिच्या दोन मुलींना जिवंत जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. असेही पोलीस ठाण्यातील तक्रारीत नमूद केले आहे.

खळबळजनक बाब म्हणजे प्रसाद याच्या घराला शनिवारी सकाळी साडे सहा वाजता आग लागल्यानंतर पोलिसांना ही माहिती सकाळी आठ वाजता देण्यात आली होती. त्यावेळीच पोलिसांना या घटनेबद्दल संशय व्यक्त केला होता. रविवारी मुलींच्या आईचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी नऊ वाजता १२ मिनिटांच्या अंतराने दोन्ही मुलींनी प्राण सोडले. समीरा पाटील समीक्षा पाटील त्या ९१ टक्के भाजल्या होत्या.

या मुलींची आई प्रीती ही ९१ टक्के भाजली होती. प्रीतीच्या भावाने या मृत्यूला प्रीतीचा पती प्रसाद पाटील हाच जबाबदार असल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात केली आहे. प्रीती, समीरा, समीक्षा यांच्यावर डोंबिवली एमआयडीसीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. डाॅक्टरांनी अथक प्रयत्न करुन या तिघींवर उपचार सुरू ठेवले होते. भाजण्याचे प्रमाण अधिक असल्याने त्यांचा मृत्यू झाला, असे डाॅक्टरांनी सांगितले. एकाच घरातील तीन जणांचा मृत्यू झाल्याने डोंबिवलीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *