गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

ब्रेकअपनंतर प्रियकराला प्रेयसीने कुटुंबियांच्या मदतीने जिवंत जाळले; तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

नाशिकमध्ये प्रेम प्रकरणातून एका तरुणाला मारहाण करत जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

संबंधित प्रकार १२ फेब्रुवारी रोजी घडला होता. तर १३ फेब्रुवारी रोजी म्हणजेच व्हॅलेंटाइन्स डेच्या पूर्वसंध्येलाच प्रेम प्रकरणामधून झालेल्या या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पीडित तरुणाचा उपचारादरम्यान सायंकाळी सातच्या सुमारास मृत्यू झाला.

नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहोणेर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. ब्रेकअपनंतर प्रियकर प्रेयसीच्या लग्नाला अडथळे आणत असल्याच्या रागातून ही घटना घडली आहे. या घटनेत जखमी युवक ५५ टक्के भाजला होता. उपचारादरम्यान दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला.

शनिवारी नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहोणेर गावात राहणाऱ्या गोरख काशिनाथ बच्छाव या ३१ वर्षे युवकाला मारहाण करत जिवंत जाळल्याची घटना घडली होती. मागील तीन वर्षापासून कल्याणी गोकुळ सोनवणे या युवतीसोबत गोरखचे प्रेमसंबंध होते.

पण या प्रेम प्रकरणाला कल्याणीच्या कुटुंबियांचा विरोध असल्यामुळे त्यांच्यातील प्रेमसंबंध तुटले होते. गोरखने मात्र कल्याणी आणि तिच्या कुटुंबीयांकडे लग्नासाठी आग्रह धरला. पण कल्याणीच्या कुटुंबियांनी गोरख सोबतच्या लग्नाला स्पष्ट नकार देत कल्याणीचे लग्न दुसरीकडे लावून देण्याचा निर्णय घेतला.

ही बाब गोरखला खटकली आणि कल्याणीच लग्न जिथे ठरले होते त्याने ते लग्न मोडण्याचा प्रयत्न केला होता. याच रागातून शनिवारी दुपारच्या सुमारास कल्याणी सोनवणे आणि या युवतीचे आई-वडील भाऊ यांनी देवळा तालुक्यातील लोहोणेर गावात जाऊन गोरखला मारहाण केली आणि त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी देवळा पोलिसांनी कल्याणी सोनवणेसह तिचे वडील गोकुळ सोनवणे, आई निर्मला सोनवणे, भाऊ हेमंत सोनवणे आणि प्रसाद सोनवणे यांना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे. गोरखच्या मृत्यूनंतर आता आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *