ताज्याघडामोडी

राज्य सरकारची नववर्षाच्या स्वागतासाठी नवीन नियमावली

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण वाढत आहेत. त्यातच नववर्षाच्या स्वागतासाठी गर्दी जमण्याची शक्यता असून त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने नवीन नियमावली जारी केली आहे. त्यानुसार, काही निर्बंध घालण्यात आले आहेत. सोबतच ३१ डिसेंबर आणि नवीन वर्षाचे स्वागत साधेपणाने करण्याचे आवाहन देखील सरकारकडून करण्यात आले आहे.

२५ डिसेंबरपासून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला कार्यक्रमासाठी सभागृह बूक करण्यात आले असतील, तर तिथे आसनक्षमतेच्या ५० टक्के लोकांना परवानगी असेल.

तसेच याठिकाणी गर्दी होणार नाही, सुरक्षित अंतर राखले जाईल, तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर केला जाईल, याकडे लक्ष देणे आवश्यक असेल. ६० वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक आणि १० वर्षांखालील मुलांनी घराबाहेर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान मुंबईत ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी करू नये. तसेच नागरिकांनी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी याठिकाणी गर्दी करू नये. नववर्षाच्या निमित्ताने कोणत्याही धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये.

फटाक्यांची आतिषबाजी करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने जारी केलेल्या या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *