मोबाइलवर खेळलेल्या सट्टेबाजीचे चार लाख रुपये वसूल करण्यासाठी 5 जणांनी एका तरुणाचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी तरुणाचं अपहरण करून त्याला लाथाबुक्क्यांनी, पाइप आणि कंबरेच्या बेल्टने बेदम मारहाण केली आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी तरुणाच्या खिशात ठेवलेल्या सोन्याच्या अंगठ्या आणि गुगल पे वरून 15 हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले आहेत. आरोपींनी एकून एक लाख रुपयांचा मुद्देमाल लुटला आहे.
संबंधित प्रकार 10 ते 19 ऑक्टोबर दरम्यान घडला आहे. याप्रकरणी पीडित तरुणानं कोंढवा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अभय जोगदंड (वय 30, रा. अपर डेपो, बिबवेवाडी), अभी बाळशंकर (वय 32, रा. काकडेवस्ती, कोंढवा) या दोन मुख्य आरोपींसह त्यांच्या अन्य तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मारहाण, अपहरण, लुटमार अशा विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काही दिवसांपासून आपल्या मोबाइलवर सट्टा खेळत होते. यामध्ये फिर्यादी 3 लाख 96 हजार रुपये हरले होते. सट्ट्यात हरलेले पैसे परत देत नाही म्हणून आरोपींनी 10 ऑक्टोबर रोजी फिर्यादीला अडवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. आताच्या आता पैसे दे, नाहीतर उचलून नेऊन हात-पाय तोडेल अशी धमकी आरोपींनी दिली होती. त्यानंतर आरोपींनी 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी फिर्यादीचं अपहरण करत त्याला जबरी मारहाण केली आहे.
आरोपींनी फिर्यादीला कारमध्ये घालून त्यांचं अपहरण केलं. गाडीत ठेवलेला पाईप, कंबरेचा पट्टा, वायर आणि लाथाबुक्क्यांनी जबरी मारहाण केली आहे. आरोपींनी फिर्यादीच्या खिशातील प्रत्येकी अर्धा तोळे वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल फोन आणि गुगल पेवरुन 15 हजार रुपये जबरदस्तीनं ट्रान्सफर करुन घेतले आहेत. आरोपींनी जबरदस्तीने एक लाख रुपयांचा मुद्देमाल लुटला आहे. या घटनेचा पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.