गेल्या वर्षभरापासून नगर पालिकेचे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कोरोना काळात आपले कर्तव्य पार पाडत आले आहेत.शासनाच्या प्रत्येक आदेशाची अमलबजावणी करताना स्वतःच्या व कुटंबियांच्या जीविताची कुठलीही तमा न बाळगता कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या या नगर परिषद कर्मचाऱ्यांना शासनाचे कुठलेही विमा कवच उपलब्ध नाही.आता दुसऱ्या लाटेतही शासनाच्या आदेशाचे व नगर पालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या प्रत्येक जबाबदारीचे पालन करताना नगर पालिकेचे कर्मचारी आपल्या कर्तव्यात कुठलीही कसूर न करता कार्यरत असताना त्यांना शासनाकडून किमान १० लाखाचे तरी आरोग्य व जीवन विमा सुरक्षा कवच मिळावे अशी मागणी पंढरपुर नगर पालिकेच्या आरोग्य समितीचे सभापती विक्रम शिरसट यांनी राज्याचे नगर विकास राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यातील अनेक नगर परिषद कर्मचाऱ्यांना कोरोना प्रसार रोखण्यासाठी देण्यात आलेली जबाबदारी पार पडताना बाधित होऊन आपले जीव गमवावे लागले आहेत तर अनेकांनी कुटूंबातील सदस्यांचे प्राण गमावले आहेत.त्यामुळेच अशा अशा कर्मचाऱ्यांना शासनाने १० लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच तर कर्मचारी अथवा त्याच्या कुटूंबातील व्यक्ती कोरोनाने मयत झाल्यास २५ लाख रुपयांचे जीवन विमा संरक्षण द्यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.