ताज्याघडामोडी

योग्य कोण? पंतप्रधान की तुम्ही?; जयंत पाटलांचा फडणवीसांना सवाल

मुंबई: करोनाविरोधी लढ्यात महाराष्ट्र सरकार करत असलेल्या चांगल्या कामाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. ही संधी साधत राज्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सणसणीत टोला हाणला आहे.

महामारीला सुरुवात झाल्यापासून फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते या-ना-त्या कारणावरून राज्य सरकारवर टीका करत आहेत. एकीकडं भाजप लॉकडाऊनला विरोध करतोय, तर दुसरीकडं राज्यातील करोनाग्रस्तांचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप केला जात आहे. फडणवीस यांनी कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उजेडात येत नाही, चाचण्यांमध्ये तडजोड करत करोना संसर्गाचा दर कमी होत असल्याचं आभासी चित्र उभं केलं जात आहे. त्यामुळं करोनाविरोधी लढ्यात अडथळे येत आहेत, याकडं फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे. काही महिन्यांची तुलनात्मक आकडेवारीही फडणवीसांनी पत्राद्वारे दिली आहे. बनवाबनवी करून जनतेची दिशाभूल करणं बंद करा, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

या पत्रावरून जयंत पाटील यांनी फडणवीसांवर खोचक शब्दांत टीका केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी मुख्यमंत्री ठाकरे यांना फोन करून करोनाच्या बाबतीत राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं. पाटील यांनी ट्वीटच्या माध्यमातून फडणवीसांना त्याची आठवण करून दिली आहे. ‘महाराष्ट्र सरकारनं केलेल्या प्रयत्नांचं पंतप्रधानांनी नुकतंच कौतुक केलंय. याची आपल्याला जाणीव असेल अशी आशा आहे. आता मुख्य प्रश्न असा आहे की योग्य कोण? माननीय पंतप्रधान की तुम्ही?,’ असा खोचक सवाल पाटील यांनी फडणवीसांना केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *