ताज्याघडामोडी

बार मालकांना आणि हॉटेलचालकांना सवलत देण्याची शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

मुंबई : राज्यात करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि रुग्णासंख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केलेले आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच आर्थिक व्यवहार खिठप्प झाले आहेत. हॉटेल व्यावसायिक आणि बार चालकांनाही या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. याचीच दखल घेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते. त्यावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी पवारांवर निशाणा साधला आहे.

अतुल भातखळकर यांनी शरद पवारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेले ट्विट केले असून, टोला लगावला आहे. ‘शरद पवार साहेबांनी बारमालकांना वीज बिलात सवलत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.याच कळकळीने आपण शेतकऱ्यांसाठीही एखादे पत्र पाठवाल अशी अपेक्षा आहे. १०० कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला आहे, हे मी नमूद करू इच्छितो,’ असा टोला भातखळकर यांनी शरद पवारांना लगावला आहे.

मा. @PawarSpeaks साहेबांनी बारमालकांना वीज बिलात सवलत द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, याच कळकळीने आपण शेतकऱ्यांसाठीही एखादे पत्र पाठवाल अशी अपेक्षा आहे. १०० कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला आहे हे मी नमूद करू इच्छितो.

यासोबतच भातखळकर यांनी आणखी एक ट्विट केलं असून, शरद पवारांचं मराठा आरक्षणाकडे लक्ष वेधलं आहे. ‘शरद पवार साहेब हॉस्पिटलमधून सकुशल आल्याबद्दल आपले अभिनंदन. प्रकृती सावरल्यावर आपण सर्वप्रथम बार मालकांसाठी आवाज उठवलात, बहुधा मराठा आरक्षणाचे वृत्त आपल्या कानावर आले नसावे. बार मालकांच्या प्रकरणातून वेळ मिळाला, तर थोडं तिथेही लक्ष द्या. मराठा समाज आशेने आपल्याकडे पाहतोय,’ असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

‘एफएल-३ परवानाधारक हॉटेल-परमिट बार मालकांना अबकारी कराचा भरणा किमान ४ हप्त्यांमध्ये करण्याची सवलत द्यावी. वीज बिलात सवलत मिळावी तसेच मालमत्ता करात सूट मिळावी आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आपतकालीन पतरेखा हमी योजना क्र. १.० व २.० अंमलात आणून सदर योजनेला दिनांक ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच, पर्यटन-आदरातिथ्य व्यवसायांकरिता क्र. ३.० योजना जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात देखील उद्योग -व्यवसायाला संजीवनी देणारी, रोजगाराला प्रोत्साहन देणारी योजना राबवावी,’ शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *