ताज्याघडामोडी

राजगृहाची तोडफोड करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची राष्ट्रवादी व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी

राजगृहाची तोडफोड करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची राष्ट्रवादी व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी

हे तर समाज विघातक विकृत मानसिकतेचं दुष्कृत्य !

पंढरपूर – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील ऐतिहासिक असणाऱ्या व महत्वाच्या राजगृह या निवासस्थानी झालेल्या तोडफोडीच्या घटनेचा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टी यांच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. जी घटना घडलेली आहे ती निश्चितच निषेधार्ह असून हे समाज विघातक विकृत मानसिकतेचं दुष्कृत्य आहे. राज्य शासनाने घटनेची गंभीर दखल घेवून जे आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक करून कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पंढरपूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष संजय बंदपट्टे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे, शहराध्यक्ष संदिप मांडवे यांनी केली आहे.
यावेळी जिल्हा सरचिटणीस दिगंबर सुडके, जिल्हा सचिव सुरज पेंडाल, शहर उपाध्यक्ष सोमनाथ थिटे, मल्हार आर्मीचे शहराध्यक्ष संतोष बंडगर, शहर उपाध्यक्ष गिरीष चाकोते, सचिन सोलंकी, ओबीसी सेलचे शहर उपाध्यक्ष मनोज आदलिंगे, दत्ता भोसले यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याबाबत प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे म्हणाले की, घडलेली घटना ही निश्चितच निदंनीय असून जातीयवादी शक्तीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि नेहरू यांचे महत्व कधीच मान्य नव्हते व नाही. आज महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार चांगल्या पध्दतीने कोरोनासारख्या महामारीमध्ये काम करीत असताना सरकारला अडचणीत आणण्याच्या हेतूने हे कृत्य केलेले आहे. या घटनेमध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ही राज्याचे गृहमंत्री अनिलजी देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे,अशी माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *