राज्यभरात पावसानं धुमाकूळ घातला आहे. संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. या पुराचा मोठा फटका सामान्य नागरिकांना बसला आहे. अनेकांच्या घरात पुराचं पाणी शिरल्यामुळे संसार वाहून गेला. लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली आल्यानं बळीराजावर दुबार पेरणीचं संकट ओढावलं आहे. मात्र यातच आता एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. पुणे वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील काही दिवस पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका हा कोकण आणि विदर्भाला बसला आहे. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 17 टक्के अधिक पाऊस झाला आहे. मात्र जरी असं असलं तरी पावसाचं प्रमाण असमान आहे. कोकण, गोव्यात सरासरीच्या 36 टक्के अधिक पाऊस झाला आहे, तर मध्य महाराष्ट्रात सरासरी इतका पाऊस झाला आहे. दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात सरासरीच्या 15 टक्के जास्त पाऊस झाला आहे. तर अहमदनगर, सांगली, सातारा, जालना, अमरावती या जिल्ह्यांना अद्यापही पावसाची प्रतिक्षा आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाहीये. मात्र काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, पुणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांना आज यलो अलर्ट देण्यात आला असून, या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.