ताज्याघडामोडी

ठाकरे सरकारने मंजूर केलेल्या प्रकल्पांना स्थगिती, शिंदेंचा आदेश घटनाबाह्य, हायकोर्टाचं गंभीर निरीक्षण

राज्यात सत्तापालट झाल्यानंतर आधीच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेले प्रकल्प व विकासकामे यांना स्थगिती देण्याचा एकनाथ शिंदे सरकारचा आदेश घटनाबाह्य असल्याचे गंभीर निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नोंदवले.

‘आधीच्या सरकारने ज्या प्रकल्प व विकासकामांना छाननीअंती रीतसर मंजुरी दिली आणि नंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनात रीतसर निधीही मंजूर झाला; शिवाय राज्यपालांची मंजुरीही मिळाली, अशा कामांना नंतर सत्तेत आलेल्या मुख्यमंत्र्यांनी (एकनाथ शिंदे) निव्वळ तोंडी आदेश देऊन स्थगिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे मुख्य सचिवांनी अशी सर्व कामे स्थगित करण्याचे निर्देश सर्व विभागांच्या सचिवांना १८ व २१ जुलै २०२२ रोजी दिले. हे आदेश राज्यघटनेला व कायद्याला धरून नसल्याने प्रथम उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयातील खंडपीठानेही काही याचिकांत रद्दबातल केले. त्यामुळे तसाच दिलासा आमच्या याचिकांतही मिळावा म्हणून आम्ही याचिका केल्या आहेत’, असे म्हणणे अॅड. संभाजी टोपे यांनी अनेक आमदारांसाठी दाखल केलेल्या वेगवेगळ्या याचिकांच्या समर्थनार्थ मांडले.

तसेच त्यांनी यासंदर्भातील उच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या खंडपीठांच्या आदेशांतील निरीक्षणेही मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय व न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर उद्धृत केली. ‘शिंदे सरकारने केवळ राजकीय हेतूने मंजूर झालेले प्रकल्प व विकासकामे स्थगित केली’, असा आरोप करत त्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या ८०हून अधिक याचिका न्यायालयासमोर आहेत. त्यातील काही याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील व्यंकटेश धोंड यांच्यासह अन्य वकिलांनीही सरकारचा निर्णय घटनाबाह्य असल्याचा युक्तिवाद मांडला. मात्र, याचिकाकर्त्यांच्या म्हणण्याला राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांनी हरकत घेतली.

‘मुख्य सचिवांनी एकच आदेश काढलेला नाही. एकापेक्षा अधिक आदेश काढले आहेत. शिवाय नव्या सरकारने नंतर अनेक विकासकामे व प्रकल्पांचे पुनर्विलोकनही केले आहे. जवळपास ८० ते ९० टक्के विकासकामे व प्रकल्पांची पुनर्रचनाही करण्यात आली आहे. शिवाय तसे करण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे. यापूर्वी उच्च न्यायालयाने काही प्रकल्पांबाबत सरकारच्या आदेशाला स्थगिती आदेश दिला असला, तरी तो सरसकट मानला जाऊ शकत नाही. कारण विकासकामे व प्रकल्प एकाच विभागाचे नसून, वेगवेगळ्या विभागांतर्गत आहेत. आता ८०हून अधिक याचिकांद्वारे पूर्वीच्या न्यायालयीन आदेशांप्रमाणेच आदेश करण्याची विनंती उच्च न्यायालयाला करण्यात आली असली, तरी तसा आदेश सरसकट देणे योग्य होणार नाही’, असा युक्तिवाद राज्याचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांनी मांडला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago